पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात कोल्ड वॉर रंगल्याची चर्चा आहे. पुण्यातल्या अजित पवारांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे चंद्रकांत पाटील नाराज असल्याची चर्चा आहे. अजित पवार यांनी तर पुण्याच्या पालकमंत्री पदाबाबतच्या प्रश्नावर तुझ्या तोंडात साखर पडो, असं म्हटलं होतं. त्यामुळे पुणे शहराच्या कारभाराची सूत्रं ही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे असली, तरी अजित पवार यांनी पुण्याकडे विशेष लक्ष केंद्रित करून बैठकांवर बैठकांचं आयोजन केलं आहे. तसंच, याचसंबंधी चंद्रकांत पाटील यांन पत्र लिहित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केल्याचं सांगितलं जात आहे. आता यावर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.(Cold War between Ajit Pawar and Chandrakant Patil Uday Samant gave an statement on it)
अजित पवार घेत असलेल्या बैठकांना पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांना निमंत्रित केलं जात आहे. परंतु, बैठकांच्या केंद्रस्थानी अजित पवारचं असतात. तसंच, सर्व निर्णयही ते घेत असतात. असं म्हटलं जात आहे. तसंच, अजित पवारांच्या मे महिन्यात पुणे जिल्हा नियोजन समिती बैठकीत 400 कोटी रुपायांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. परंतु, अर्थमंत्री अजित पवार यांनी या निधीला अद्याप मंजुरी दिली नाही. त्यामुळे याची तक्रार करणारं पत्र पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लिहिल्याचं म्हटलं जात आहे. गणेशोत्सव मंडळांसोबतच्या बैठकीतही दोन्ही नेते एकत्र होते मात्र पालकमंत्री चंद्रकांत पाटलांऐवजी अजित पवारच माध्यमांना सामोरे गेले. त्यामुळे पुण्यात दादा विरुद्ध दादा असं शीतयुद्ध रंगल्याची चर्चा आहे. यावर आता राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिलं आहे.
(हेही वाचा: महाविकास आघाडीपाठोपाठ आता भाजपा-शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीच्या आढावा बैठका )
काय म्हणाले उदय सामंत?
चंद्रकांत पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ काय बोलले? हे मला माहीत नाही. ते वरिष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांच्यात काय चर्चा झाली हे मला माहित नाही. परंतु, असं समन्वय नसल्याचं वातावरण महाराष्ट्रात कुठेही नाही. सगळे नेते महाराष्ट्रात चांगल्याप्रकारे समाजकारण आणि राजकारण करणारे आहेत. त्यामुळे सगळ्यांमध्ये अतिशय चांगला समन्वय आहे. एकनाथ शिंदे आणि चंद्राकात पाटील यांच्यात काय चर्चा झाली. हे मला माहित नाही, असं उदय सामंत म्हणाले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
उदय सामंत पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री आहे. प्रत्येकाकडे दोन-तीन जिल्हे आहेत. त्यामुळे प्रत्येकाकडे एक-एक जिल्हा द्यावा, अशी महायुतीत चर्चा असू शकते. परंतु एखाद्या जिल्ह्याला पालकमंत्रीच नाहीत, अशी स्थिती कुठेही नाही. फक्त जेवढे जिल्हे आहेत, तेवढी मंत्र्यांची संख्या नसल्यानं काही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी झेंडावंदन केलं.