घरमहाराष्ट्रकोकणRaigad Water Crisis : जलजीवन योजना ठेकेदारांसाठी आहे का?

Raigad Water Crisis : जलजीवन योजना ठेकेदारांसाठी आहे का?

Subscribe

जलजीवन मिशन अंतर्गत केलेल्या कामांचा दर्जा निकृष्ट असून पाणी योजना राबवूनही पाण्यासाठी वणवण सुरूच आहे. त्यामुळे ही योजना नक्की कुणासाठी, असा सवाल कर्जत तालुक्यातील डामसेवाडी ग्रामस्थांनी केला आहे

नेरळ : रायगड जिल्ह्यात जलजीवन मिशन योजना अनेक ठिकाणी फसल्याने योजना त्रासदायकच जास्त झाली आहे. अशातच कर्जत तालुक्यातील डामसेवाडीमध्ये ही योजना ग्रामस्थांसाठी भीतीदायक ठरत आहे. या योजने अंतर्गत डामसेवाडीत बांधण्यात आलेल्या जलसाठवण टाकीचे काम निकृष्ट असून ती टाकी पडली तर मोठी दुर्घटना घडेल, अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. तर या योजनेचा देखील बोऱ्या वाजल्याने वाडीतील ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट किंवा बाजूच्या विहिरीतील हिरवे पाणी पिण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या योजनेची वरिष्ठ पातळीवरून चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी असलेली ‘हर घर नल से जल’ ही योजना महाराष्ट्रात ‘जलजीवन मिशन’ म्हणून ओळखली जाते. या योजनेचे रायगड जिल्ह्यात बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. कर्जत तालुक्यातील ग्रामीण भाग पुन्हा टँकरवर आला आहे. २०२१ मध्ये सुरू झालेल्या जलजीवन मिशनच्या कामानंतर तालुका टँकरमुक्त होईल, ही आशा फोल ठरली आहे. कारण जलजीवन मिशनच्या माध्यमातून पूर्ण झालेल्या योजना भर उन्हाळ्यात आटल्या आहेत. तेव्हा या योजना कोणासाठी? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Raigad Water Crisis : कर्जतमध्ये जलजीवन योजनेचा बोऱ्या, पाणीटंचाईच्या तीव्र झळा

कर्जत तालुक्यात दुर्गम भाग असलेल्या नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील डामसेवाडी येथे सुमारे ७२ लाख रुपये खर्चून जलजीवन मिशन योजना राबवली. एप्रिल २०२२ मध्ये कार्यारंभ आदेश मिळाले असताना दोन वर्षांत ही योजना ठेकेदाराला पूर्ण करता आली नाही. ही योजना राबवताना त्याचे पाईप अनेक ठिकाणी खोलवर न टाकता वरच्यावर टाकण्यात आले आहेत. तर टाकीचे काम करताना पाण्याचा वापर नगण्य असल्याने हे काम निकृष्ट झाले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गंभीर बाब म्हणजे नव्या उद्भव विहिरीचा पत्ताच नाही. त्यामुळे डामसेवाडीत पुन्हा पाणीबाणी उद्भवली आहे आणि महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागते.

- Advertisement -

हेही वाचा… Karjat : अट्टल घरफोड्याला केले जेरबंद ; कर्जत पोलिसांची कामगिरी

अगदी गरज म्हणून काही अंतरावर असलेल्या विहिरीतील हिरवे दूषित पाण्यावर ग्रामस्थांना जगावे लागत आहे. त्यामुळे आमचा अंत किती दिवस पाहणार, असा जळजळीत सवाल ग्रामस्थ करत आहेत. तर पुढील ३ दिवसांत ग्रामस्थांना पाणी मिळाले नाही तर योजना गुंडाळून घेऊन जा, असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.

दरम्यान तालुक्यात काही अपवाद सोडले तर जलजीवन मिशनच्या कामात अनेक त्रुटी असल्याने योजना अडचणीत सापडल्या आहेत. तालुक्यात पुन्हा एकदा १८ गावे आणि ६० वाड्यांमध्ये पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे या योजना ग्रामस्थांसाठी की ठेकेदारासाठी, असा प्रश्न विचारला जातोय.

टाकीसकट पाईपलाईन घेऊन जा!

डामसेवाडी येथील जलसाठवण टाकीचे सिमेंट निघत आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना घडू शकते. जलवाहिनी जमिनीखाली खोल न टाकता वरचेवर टाकली आहे. एखादी गाडी गेली तरी जलवाहिनी तुटेल. दोन दिवस या योजेतून पाणी येईल नंतर परत पुन्हा हंडे घेऊन पायपीट करावी लागेल, हे चुकीचे आहे. ही टाकी नव्याने बांधावी आणि आमची योजना सुरळीत तसेच लवकर सुरु करावी अन्यथा या टाकीसकट ही पाईपलाईन अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे घेऊन जावी, बिल काढण्यासाठी नुसते फोटो काढायला येऊ नये. – देविदास केवारी, ग्रामस्थ-डामसेवाडी

आजारी पडल्यास जबाबदार कोण?

महिलांना पाण्यासाठी खूप त्रास होतो आहे. लांब जाऊन पाणी आणावे लागते. आता कुठलाच पर्याय नसल्याने काही अंतरावरील खासगी विहिरीतून पाणी आणून तहान भागवत आहोत. मात्र ते पाणी हिरवे आहे. त्यातून आजार झाल्यास जबाबदार कोण? – शेवंता केवारी, ग्रामस्थ

योजनेचे काम व्यवस्थित

डामसेवाडी येथील टाकीचे बांधकाम व्यवस्थित झालेले आहे. फक्त त्याला फिनिशिंग केली नसल्याने ते तसे दिसते. ग्रामस्थांची तक्रार असल्याने आपण त्याचे निरीक्षण आणि तपासणी देखील करणार आहोत. तर पाईपलाईन टाकताना काही ठिकाणी खाली खडक असल्याने पाईपलाईन खोदून टाकता आली नाही. मात्र बाकी ठिकाणी व्यवस्थित काम झाले आहे. पाणी योजना सुरु करण्याच्या तयारीत आहोत.

– अनिल मेटकरी, उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग कर्जत

(Edited by Avinash Chandane)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -