मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली. असे असतानाच आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाचा प्लॅन तयार असून, महाविकास आघाडीला चेकमेट देण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. (Rajya Sabha Election BJP plan ready for Rajya Sabha Such is the math of opinion)
2019 पासून राज्यातील राजकारणात एकापाठोपाठ एक राजकीय धक्के बसल्याचे अख्या महाराष्ट्राने पाहले. याच दरम्यान मागील विधान परिषद आणि राज्यसभा निवडणूक मतदानावेळी शिवसेनेत उभी फूट पडली होती. तर आता होऊ घातलेल्या राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर आहे. जर अशोक चव्हाण आपल्यासोबत अनेक आमदारांना घेऊन भाजपावासी झाले, तर एकही जागा महाविकास आघाडीला जिंकता येणार नाही, अशी रणनीती भाजपने आखल्याचे दिसून येत आहे.
या खासदारांचा संपणार कार्यकाळ
भाजपचे विद्यमान खासदार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे, प्रकाश जावडेकर, व्ही. व्ही. मुरलीधरन हे खासदार निवृत्त होणार आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई, काँग्रेसचे खासदार कुमार केतकर आणि राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांचा कार्यकाळ संपणार आहे. या सहा जागांवर निवडणूक होत असून, या निवडणुकीआधीच काँग्रेसला अशोक चव्हाणांच्या रुपाने मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा : Ashok Chavan : काँग्रेसला महाराष्ट्रात मोठा धक्का देणाऱ्या अशोक चव्हाणांबद्दल जाणून घेऊया…
यामुळे घेतला असावा अशोक चव्हाणांनी निर्णय?
2019 च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यातील राजकारणात एक नव्हे तर अनेक चढउतार पाहायला मिळाले. दोन पक्षासह एक परिवारामध्ये याच पंचवार्षिकमध्ये फूट पडली. अशातच आता राज्यसभेची निवडणूक येऊन ठेपली आहे. महाविकास आघाडी म्हणून एकत्रित उमेदवार देण्यासाठी अडचण येत असल्याचे बोलले जात असतानाच दुसरी मोठी अडचण म्हणजे शिवसेना शिंदे गटाचा व्हिप ठाकरे गटाच्या आमदाराला लागू शकतो. कारण विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानुसार शिवसेना ही एकनाथ शिंदेंची आहे. त्यामुळे त्यांनी नियुक्त केलेले प्रतोद भरत गोगावले यांचा व्हिप शिवसेनेच्या आमदारांना लागू होईल, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा हा निर्णय अध्यक्षांकडे प्रलंबित आहे. निवडणुकीपर्यंत जर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अपात्रेबाबतचा निर्णय झाला. तर व्हिप कोणाचा हा मुद्दा राहणार नाही.
भाजप 3 जागा शिवसेना 1 राष्ट्रवादी 1 अशा महायुतीच्या 5 जागा सहज येतील त्या सोबतच अशोक चव्हाण यांच्यासोबत काही आमदार आले तर 6 वी पण जागा कशी काढता येईल याचा विचार भाजप करत आहे. आणि हाच विचार अशोक चव्हाण यांनी केला असावा म्हणून त्यांनी काँग्रेस सोडली अशीही चर्चा सध्या रंगत आहे.