उल्हासनगर येथील जीर्ण झालेल्या कामगार रुग्णालयाचा पुनर्विकास होत असून १२५ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे भूमिपूजन शिवसेना नेते आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते रविवारी दुपारी करण्यात आले. उल्हासनगरमध्ये कामगार रुग्णालयाची इमारत आणि १२ निवासी इमारती असे मोठे संकुल आहे. ह्या संकुलातील इमारती ३५ वर्ष जुन्या आहेत. दोन वर्षांपूर्वीच या सर्व इमारती जीर्ण झाल्याचा अहवाल मुंबई आयआयटीने दिला आहे. त्यामुळे या सर्व इमारती पाडून त्याजागी सुसज्ज रुग्णालय बांधण्यात येणार आहे. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, कामगार विमा योजना समितीचे प्रमुख खासदार चंद्रकांत खैरे, आमदार बालाजी किणीकर, सुभाष भोईर डॉ. बालाजी किणीकर, माजी आमदार कुमार आयलानी, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौर विनिता राणे, उल्हासनगरचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, उल्हासनगर महापालिकेतील विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे यांच्यासह स्थानिक नगरसेवक, शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदारांनी लोकसभेत केली होती मागणी
याठीकाणी सुसज्ज रुग्णालय बांधण्याची मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत ४ ऑगस्ट २०१७ रोजी केली होती. तसेच, त्यानंतर केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय, विद्यमान मंत्री संतोष गंगवार, राज्याचे तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, कामगार विमा योजनेचे महासंचालक राजकुमार, मुख्य अभियंते सुदीप दत्ता, कामगार विमा योजना समितीचे प्रमुख खासदार चंद्रकांत खैरे अशा सर्व पातळीवर सातत्याने पाठपुरावा करून या पुनर्विकासाला मंजुरी मिळवली. केंद्र शासनाने १२५ कोटी रुपयांचा निधी या प्रकल्पासाठी मंजूर केला असून जुन्या रुग्णालयाच्या जागी १०० खाटांचे अद्ययावत, सुसज्ज रुग्णालय उभे राहणार आहे. हे रुग्णालय पूर्ण होण्यास १०३ कोटी रुपये लागणार असून अडीज वर्षाच्या कालावधीत इमारतीचे बांधकाम पूर्ण होईल.