पुणे : तलाठी भरतीच्या परीक्षेतील गुणांवरून मोठा गोंधळ उडाला आहे. या भरती परीक्षेत अनेक उमेदवारांना 200 पैकी 2014 किंवा 200 पेक्षा जास्तच गुण मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. परंतु, या प्रकरणी सरकारकडून अद्यापही कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. तर याच प्रकरणावरून आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोप केले होते. तलाठी भरतीत एकेका जागेसाठी 25 लाख रुपये घेतल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला होता. यावरून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी रोहित पवारांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता. विखे पाटलांच्या या इशाऱ्याला आता रोहित पवारांकडून आव्हान देण्यात आले आहे. (Rohit Pawar challenges Radhakrishna Vikhe Patil’s warning of action)
वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटची सर्वसाधारण सभा आज पुण्यात पार पडत आहे. या सभेला रोहित पवार उपस्थित आहेत. त्याआधी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत विविध प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी प्रसार माध्यमांसमोर रोहित पवारांनी सांगितले की, आम्ही पेपर फुटीचा मुद्दा उपस्थित केल्यावर तरूण गंभीर नसल्याचे उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस द्यायचे. तलाठी भरती किंवा अन्य ज्या प्रक्रिया महाराष्ट्रात सुरू आहेत, त्यात अनेक भ्रष्टाचार सुरू आहेत. त्यामुळे आता हा मुद्दा तरूणांनीच उपस्थित केला आहे. विखे-पाटलांनी आमच्यावर कारवाई करावी, असा इशारा देत रोहित पवार म्हणाले की, आमच्यावर इतक्या कारवाया झाल्या आहेत, आता कुठली राहिली का? हा प्रश्न आहे. पण, तरूणांनी दिलेल्या पुराव्यांकडे लक्ष द्यावे, असे सल्लाही रोहित पवारांकडून देण्यात आले आहे.
काय म्हणाले होते रोहित पवार?
तलाठी भरतीत अनेक ठिकाणी पेपरफुटीप्रकरणी गुन्हा दाखल झाला, पण या सरकारने पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. तलाठी भरतीत एकेका जागेसाठी 25 लाखाहून अधिकची वसुली झाली. सरकार, अधिकारी, परीक्षा घेणारी कंपनी असे सर्वच यात सहभागी असून जवळपास 1500 कोटीहून अधिकचा हा घोटाळा आहे. केवळ काही कोटींच्या लाचेसाठी वर्षानुवर्षे अभ्यास करणाऱ्या लाखो युवांच्या, त्यांच्या आईवडिलांच्या स्वप्नांचा खून करण्याचे पाप या सरकारने केले आहे, असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला होता.
तर, रोहित पवारांनी केलेल्या आरोपांवर कारवाई करण्याचा इशारा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडून देण्यात आला होता. याबाबत बोलताना विखे पाटील म्हणाले की, गुणवत्तेच्या आधारावर उत्तीर्ण झालेल्या तरूणांवर अन्याय का करायचा? रोहित पवारांनी भरतीसाठी 25 लाख रूपये घेतल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार आहोत. तलाठी भरतीत कुठलाही गैरव्यवहार आणि गैरप्रकार झाला नाही. पूर्ण पारदर्शी प्रकारे पेपर झाले आहेत. तरूणांमध्ये गैरसमज पसवणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करणारच, असा इशाराच विखे पाटलांनी दिला आहे.