घरमहाराष्ट्रसूर्य-चंद्र तुमच्या बापाचे नोकर नाहीत; कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना शिवसेनेने खडसावलं

सूर्य-चंद्र तुमच्या बापाचे नोकर नाहीत; कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना शिवसेनेने खडसावलं

Subscribe

‘सूर्य-चंद्र असेपर्यंत बेळगाव कर्नाटकातच राहील’ अशी दर्पोक्ती करणारे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्यावर शिवसेनेने टीकेचे बाण सोडले आहेत. सूर्य-चंद्र तुमच्या बापाचे नोकर नाहीत. हे याद राखा! सूर्य-चंद्राच्याच साक्षीने कर्नाटकातून तुमची अरेरावी नष्ट होईल आणि मराठी बांधवांचा लढा यशस्वी होईल, असा घणाघात शिवसेनेने त्यांचे मुखपत्र ‘सामना’ मधून केला आहे. बेळगाव हे अखंड कर्नाटकाचं अविभाज्य अंग आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नेते कितीही ओरड करत असले तरी चंद्र-सूर्य जोपर्यंत आहेत तोपर्यंत बेळगाव कर्नाटकात राहणार, असं ठाम वक्तव्य कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगाव येथे पत्रकार परिषदेत केलं. त्यावरुन आता शिवसेनेने कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना चांगलच खडसावलं आहे.

“महाराष्ट्रातील नेते कितीही ओरडत असले तरी जोपर्यंत सूर्य-चंद्र आहेत तोपर्यंत बेळगाव कर्नाटकातच राहणार असल्याची आरोळी तेथील उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी ठोकली आहे. अशा आरोळ्यांची पर्वा न करता गेल्या ७० वर्षांपासून सीमा भागातील मराठी बांधवांचा लढा सुरूआहे. हा जो कोणी लक्ष्मण सवदी गोधडीत रांगत होता त्याआधीपासून २० लाख मराठी बांधव महाराष्ट्रात येण्यासाठी संघर्ष करीत आहेत,” असा घणाघात शिवसेनेने केला आहे.

- Advertisement -

“सध्या बेळगावचा तिढा सर्वोच्च न्यायालयात लटकला आहे. त्यामुळे आता न्यायालयच काय ते ठरवेल. सूर्य-चंद्र आकाशात आहेत की नाहीत हे पाहून सर्वोच्च न्यायालय बेळगावप्रश्नी निकाल देणार नाही आणि सूर्य-चंद्र हे काही कुणाच्या बापाचे नोकर नाहीत. सूर्याच्या ढळढळीत प्रकाशझोतात बेळगावचा लढा सुरू आहे. त्याच सूर्यप्रकाशात कानडी पोलीस ‘जय महाराष्ट्र’ म्हणणाऱया मराठी बांधवांवर अत्याचार करीत आहेत व रात्रीच्या अंधारात, चंद्राच्या शीतल प्रकाशात छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवीत असतात. पण तेथील मराठी बांधवांचे मनोधैर्य खचले नाही हाच शिवरायांचा आशीर्वाद आहे,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

“सीमाप्रश्नी ६९ हुतात्मे देणारा शिवसेना हाच एकमेव पक्ष आहे. सीमा प्रश्नासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रदीर्घ तुरुंगवास भोगला आहे. सीमा भागात जेव्हा जेव्हा मराठी बांधवांवर कानडी सरकारचे हल्ले झाले, त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. सूर्य-चंद्र असेपर्यंत बेळगाव कर्नाटकातच राहील, अशी अरेरावीचे भाषा कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आज करीत आहेत. त्यांनी एक लक्षात घ्यावे, सूर्य-चंद्र महाराष्ट्रासही तेजाने प्रकाशमान करीत असतात. आचार्य अत्रे यांच्याच भाषेत सांगायचे तर ”सूर्य-चंद्र तुमच्या बापाचे नोकर नाहीत.” याद राखा! सूर्य-चंद्राच्याच साक्षीने कर्नाटकातून तुमची अरेरावी नष्ट होईल व मराठी बांधवांचा लढा यशस्वी होईल,” असं शिवसेनेने सामनातून खडसावलं.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -