खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरु केले होते. यामध्ये कोपर्डी प्रकरणात न्याय मिळवून देण्याची मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी राज्य सरकारकडे केली होती. दरम्यान अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीवर राज्य सरकारने आता अर्ज करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने कोपर्डी प्रकरणातील खटल्यात २ दिवसांमध्ये अर्ज दाखल करणार असल्याचे लेखी आश्वासन दिलं आहे. अशी माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे.
कोपर्डी खटल्यातील आरोपींना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी या मागणीसाठी उपोषण देखील केले आहे. आंदोलन आणि मोर्चांपूर्वीसुद्धा संभाजीराजेंनी कोपर्डीतील पिडीत कुटुंबीयांच्या भेटीला गेले होते. आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावे अशी मागणी करण्यात आली होती. राज्य सरकारने आता संभाजीराजेंना लेखी आश्वासन दिले आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट करत राज्य सरकारने मागणी मान्य करुन लेखी आश्वासन दिले असल्याची माहिती दिली आहे. राजे म्हणाले की, कोपर्डी खटल्याचा निकाल २०१६ साली लागला असून आरोपींना फाशीची शिक्षा झालेली आहे. २०१८ मध्ये आरोपींनी या विरूद्ध उच्च न्यायालयात अपील केले. हा कायदेशीर भाग आहे; सरकारने या प्रकरणात अर्ज देऊन खटल्याचा निकाल लवकर लावण्याची मागणी करणे गरजेचे आहे. असे संभाजीराजेंनी म्हटलं आहे.
#कोपर्डी खटल्याचा निकाल २०१६ साली लागला असून आरोपींना फाशीची शिक्षा झालेली आहे. २०१८ मध्ये आरोपींनी या विरूद्ध उच्च न्यायालयात अपील केले. हा कायदेशीर भाग आहे ; सरकारने या प्रकरणात अर्ज देऊन खटल्याचा निकाल लवकर लावण्याची मागणी करणे गरजेचे आहे. pic.twitter.com/IJaNLHuQ2k
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) March 4, 2022
राज्य सरकारकडून लेखी आश्वासन
राज्य सरकारने अर्ज देऊन खटल्याचा निकाल लवकर लावण्याच्या मागणी करावी, या मागणीवर, न्यायालय पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर लगेचच अर्ज दाखल करू, असे आश्वासन राज्य सरकारने १७ जून २०२१ रोजी आपल्याला दिले होते. मात्र आठ महिने उलटले तरी सरकारच्या वतीने असा अर्ज दाखल करण्यात आला नव्हता. इतर पाच मागण्यांबरोबरच या मागणीच्या अंमलबावणीसाठी आझाद मैदान येथे उपोषण केले असता, सरकारने दोन दिवसांत अर्ज दाखल करू असे लेखी आश्वासन दिले. त्या आश्वासनाची पूर्तता झाली असल्याची माहिती संभाजीराजेंनी दिली आहे.