राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्द्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना लक्ष्य केलं. एकतर राज्यपाल राहतील किंवा विजय करंजकर तरी आमदार होतील, अशा शब्दांत त्यांनी दिरंगाईवर आपली भावना व्यक्त केली.
खासदार संजय राऊत शुक्रवारपासून तीन दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांच्या उपस्थितीत घोटी येथील पक्ष कार्यालयाचा उद्घघाटन सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नावांचा मुद्दा गेल्या ९ महिन्यांपासून प्रलंबित राहिला आहे. राज्यपालांनी मात्र याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. परिणामी महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली भूमिका मांडली.
घोटीत शिवसेनेचा आमदार राहिला असता तर चांगलं झालं असतं. मात्र, भविष्यात इथे सेनेचाच आमदार असेल. विजय करंजकरांची आमदारकी प्रक्रियेत अडकलेली आहे. खरंतर, राज्यपालांचं त्यांच्यावर खास प्रेम आहे म्हणून हा विलंब झालाय, अशा खास शैलीत खासदार राऊतांनी आमदार नियुक्तीबाबत आपली भूमिका मांडली.