मुंबईत चारचाकी गाडीतून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी सीटबेल्टचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. सीटबेल्टच्या वापरासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी आत्तापर्यंत दोन वेळा मुदत दिली होती. मात्र ही मुदत आत संपली असून, वाहतूक पोलिसांनी अखेर कारवाईला सुरूवात केली आहे. वाहन चालकासह सहप्रवाशालाही सीटबेल्टची सक्ती कायम करण्यात आली असून या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. (Seat Belts Mandatory For Four-Wheeler Drivers And Other Passengers In Mumbai)
मुंबई वाहतूक पोलिसांनी १५ नोव्हेंबरपासून सीटबेल्टसक्तीची अंमलबजावणी करीत ४ दिवसांत तब्बल १२ हजारपेक्षा अधिक चालक आणि सहप्रवाशांवर कारवाई केली आहे. यापुढे मुंबईमध्ये चारचाकी वाहनामध्ये चालकासह इतर प्रवाशांनाही सीटबेल्ट लावणे बंधनकारक आहे. टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनानंतर देशभरातील अनेक राज्यांमध्ये वाहतुकीच्या नियमांची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली.
मोटार वाहन (सुधारित) कायदा २०१९ कलम १९४ (ब) (१) (सीटबेल्ट न लावणे) अंतर्गत मुंबईत चारचाकी मोटार वाहनातील वाहनचालक व इतर प्रवाशांना सीटबेल्ट लावणे बंधनकारक करण्यात आले. मुंबई पोलिसांनी याबाबत १४ ऑक्टोबरलाच घोषणा केली.
ज्या वाहनांमध्ये सीटबेल्ट नाहीत, अशा वाहनांना सीटबेल्ट बसविण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली होती. ही मुदत ३१ ऑक्टोबरला संपली आणि १ नोव्हेंबरपासून दंडात्मक कारवाई करण्यात येणार होती. त्यानंतर ११ नोव्हेंबरऐवजी १५ नोव्हेंबरपासून पोलिसांनी प्रत्यक्षात दंडात्मक कारवाई सुरू केली.
हेही वाचा – भाजपाकडून शिवरायांचा अपमान, शिंदे – फडणवीस सरकारने राजीनामा द्यावा; राऊतांची मागणी