घरताज्या घडामोडीपंतप्रधानांनी कानडी अत्याचाराची दखल घ्यावी -  मुख्यमंत्री

पंतप्रधानांनी कानडी अत्याचाराची दखल घ्यावी –  मुख्यमंत्री

Subscribe

हिणकस आणि विकृत प्रवृत्तीचा बिमोड करण्याची मागणी

छत्रपती शिवाजी महाराज केवळ आमचेच नाहीत तर सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही. कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या हिणकस आणि विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यासाठी पंतप्रधानांनी क्षणाचाही विलंब न लावता  स्वतः यात लक्ष घालावे आणि तेथील राज्य शासनाला त्वरित संबंधितांवर कडक कारवाई करण्यास सांगावे, अशा तीव्र शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी आपल्या भावना व्यक्त केल्या.

कर्नाटकची राजधानी बंगळुरू शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. या भ्याड कृतीचे तीव्र पडसाद आज महाराष्ट्रात उमटले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सर्वच नेत्यांनी या घटनेबद्दल संताप व्यक्त करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना  या प्रकाराकडे डोळेझाक न करण्याचे असे कर्नाटक सरकारला  बजावले.

- Advertisement -

गेले कित्येक वर्ष कर्नाटकातील मराठी बांधवांवर अत्याचार केला जात आहे. आता तर शिवरायांसारख्या आपल्या  आराध्य दैवताची विटंबना करण्याची घटना घडते आणि तेथील सरकार याकडे डोळेझाक करते हे दुर्दैवी आहे. नुकतेच वाराणसीत काशी विश्वेश्वराच्या मंदिरात पंतप्रधानांनी आपल्या भाषणात, देशाची संस्कृती चिरडण्याचा जेव्हा जेव्हा प्रयत्न झाला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांसारखे पराक्रमी राजे निर्माण झाले असे कौतुकोद्गार काढले होते. या कार्यक्रमास काही दिवस झाले नाही तोच, भाजप शासित कर्नाटकात याच शिवरायांची विटंबना होते आणि कुणावर कारवाई न करता उलट मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो हे अतिशय निंदनीय आणि अवमानकारक आहे,असे ठाकरे यांनी म्हटले आहे.

राज्यात कुणाचेही सरकार असो पण दैवते बदलत नाहीत याची जाणीव करून देत हा कानडी अत्याचार बंद करण्यासाठी आता पंतप्रधानांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने तेथील राज्य सरकारला आदेश द्यावेत  आणि या विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यास सांगावे,अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे.

- Advertisement -

बेळगावात मराठी भाषिकांच्या गळचेपी करायची. सनदशीर मार्गाने सीमाप्रश्नी लढा देत असलेल्या मराठी भाषिकांवर कन्नड कर्मठांकडून हल्ला करायचे. असे भ्याड प्रकार थांबविण्याऐवजी त्याला खतपाणी घालायचे हे चालणार नाही. छत्रपतींचे नाव केवळ राजकारणासाठी घ्यायचे आणि आमच्या दैवताचा अनादर झाल्यावर मात्र बोटचेपी भूमिका घ्यायची. हे कदापिही खपवून घेतले जाणार नाही. मराठी अस्मितेला डिवचणे परवडणारे नाही, असा इशारा देत उद्धव ठाकरे यांनी  केंद्र सरकारनेही दुतोंडी भूमिका सोडून ठोस पावले उचलावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

देश माफ करणार नाही – अजित पवार

छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी अशा कुठल्याच घटनेने जराही कमी होणार नाही. मात्र अशा घटनांना संरक्षण देणाऱ्यांना देश माफ करणार नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्नाटकातील बंगळुरु शहरात झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबना घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत त्या घटनेचा निषेध केला.

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत, देशाची अस्मिता आहेत. सर्वपक्षीय राज्यकर्त्यांसाठी आदर्श आहेत. कर्नाटकातील बंगळुरु शहरात त्यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार हा देशवासियांच्या भावना आणि राष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला आहे, असे पवार यांनी म्हटले आहे.

कर्नाटक सरकार आणि केंद्र सरकारने या घटनेकडे गांभीर्याने पहावे. दोषींना शोधून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी. अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही  अजित पवार यांनी केले आहे.


हेही वाचा – शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना हा राष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला, राष्ट्रवादीचा तीव्र शब्दात निषेध

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -