संतोष परब हल्लाप्रकरणी काल, गुरुवारी भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. यादरम्यान सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून जिल्हा न्यायालयाकडे शरण जाण्यास सांगितले. तसेच १० दिवसांमध्ये नितेश राणेंना अटक केली जाऊ नये असे निर्देश देऊन दिलासा दिला गेला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत म्हणाले की, ‘नितेश राणे यांना सर्वोच्च न्यायालयाने शरण जाण्यासाठी सांगितले आहे आणि हाच सर्वोत्तम मार्ग आहे.’
शिवसेनेचे खासदार विनायक राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ‘दाद मागून मागून प्रकरण सर्वोच्च न्यायालयाकडे गेले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांनी शरण जाणे, हाच सर्वोत्तम मार्ग आहे.’
नेमकं प्रकरण काय आहे?
शिवसैनिक संतोष परब यांच्यावर शनिवारी १८ डिसेंबरला हल्ला झाला. कारमधून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी परब यांच्यावर चाकूने हल्ला केला आणि यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. राजकीय शत्रुत्वामुळे हा हल्ला झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. परब जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. या हल्ल्यातील मुख्य आरोपीला पोलिसांनी दिल्लीतून अटक केली असली तरी हा आरोपी नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता असल्यामुळे पोलिसांकडून भाजपच्या कार्यकर्त्यांची आणि नितेश राणेंची चौकशी करण्यात आली. याप्रकरणी नितेश राणे यांनी जिल्हा सत्र न्यायालय आणि मुंबईत हायकोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र जिल्हा सत्र न्यायालय आणि मुंबई हायकोर्टाने राणेंचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने देखील नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून त्यांना शरणागती पत्कारण्यास सांगितले.
….टिपू सुलतान नाव देणे हे गैर
दरम्यान मुंबईतील मालाड येथील मैदानाला टिपू सुलतान नाव दिल्यामुळे राजकारण चांगलाचे तापले आहे. याबाबत खासदार विनायक राऊत म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेचा कोणताही ठराव मंजूर न होता एका मैदानाला टिपू सुलतान नाव देणे हे गैर आहे. आणि महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया योग्य आहे.
हेही वाचा – विधान परिषदेच्या १२ आमदारांची फाईल राज्यपालांनी दाबणे हेच ‘डेंजर टू डेमोक्रसी’- संजय राऊत