आज सकाळी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि ऑफीसवर ईडीने छापा टाकला. तसेच प्रताप सरनाईक यांचे सुपुत्र पूर्वेश सरनाईक आणि विहंग सरनाईक यांच्या घरीही ईडीचे पथक दाखल झाले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, ‘काही झाले तरी आमचे सरकार आणि आमदार, नेते कोणालाही शरण जाणार नाहीत. जर तुम्ही सुरुवात केली असेल तर शेवट आम्हीच करणार आहोत.’
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, ‘काही झाले तरी आमचे सरकार आणि आमदार, नेते कोणालाही शरण जाणार नाहीत. आम्ही लढत राहू, हे सरकार पुढील चार वर्षे नाही तर २५ वर्षे राहिल. एजन्सीचा वापर करून जे सरकारवर दबाव आणू इच्छितात, जे आमदाराचे मनोबल तोडू इच्छितात त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. हा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराज्यांचा महाराष्ट्र आहे. तुम्ही कितीही दबाव आणा, तुम्ही कितीही दहशत निर्माण करा. आम्ही कोणाला घाबरत नाही. पुढील २५ वर्ष तुमच सरकार येईल, हे स्वप्न विसरून जा, ही आता काळ्या दगडावरची रेख आहे.’
‘ईडीने राजकीय पक्षाची शाखा असल्यासारखे काम करू नये’
‘आज तुम्ही सुरुवात केली असेल तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहित आहे. आमच्या प्रत्येक आमदारांच्या, खासदारांच्या नेत्यांच्या घरासमोर ईडीने कार्यालय थाटलं, तरी आम्ही घाबरत नाही. ईडी आणि अन्य एजन्सीने राजकीय पक्षाची शाखा असल्यासारखे काम करू नये. ज्याचे आदेश ते पाळतायत आज त्या पक्षाच्या १०० लोकांची यादी मी पाठवून देतो. त्यांचे काय धंदे आहेत, त्यांचे काय उद्योग आहेत, त्यांची मनी लॉड्रिंग कशाप्रकारे चालू आहे, निवडणूकीत कुठून पैसा येतो, कसा वापरला जातो आणि कुठे ठेवला जातो, कसा वाटला जातो, कोणाच्या माध्यमातून येतो, ही कल्पना ईडीकडे नसली तरी आमच्याकडे आहे. पण गेल्या काही वर्षांपासून केंद्रीय तपास यंत्रणा या अलीकडच्या सत्ताधाऱ्यांचे गुलाम, चाकर, नोकर असल्यासारखे वागत असतील तर आम्ही परवा करत नाही. तुम्ही किती नोटीसी पाठवा, तुम्ही कितीही धाडी घाला, तुम्ही किती खोटी कागदपत्रे बनवा, तुम्ही खोटे पुरावे तयार करा शेवटी या महाराष्ट्रात महाविकास आघाडीबाबत सत्याचाच विजय होईल’, असे संजय राऊत म्हणाले.
‘आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही’
पुढे राऊत म्हणाले की, ‘ईडीने त्याचे कार्यालय भाजप कार्यालयात उघडले असावे. पण उघडून द्या काही हरकरत नाही. आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. कोणाला अटक करायची आहे करू द्या. नोटीस कसल्या पाठवताय, हिम्मत असेल तर घरी या. आज प्रताप सरनाईक त्यांच्या घरी नाही आहेत. त्याची मुले घरी आहेत. हे पाहून ईडीने धाड टाकली आहे. ही नामर्दानगी आहे. भारतीय जनता पक्षाने सरळ लढाई केली पाहिजे. ईडी आणि सीबीआयचा वापर करून केंद्रीय सत्तेचा वापर करून जर आमच्यासोबत कोणी लढायचा प्रयत्न करत असेल. तर विजय आमचाच आहे.’
हेही वाचा – शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीचा छापा