पिवळीहून सुटलेल्या एसटी बसला शिरीषपाडा-शहापूर रोडवर अपघात झाला. या अपघातात 64 जण जखमी झाले असून त्यात 50 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यापैकी पाच विद्यार्थी गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
ही बस सकाळी साडेसहा वाजता पिवळीवरुन वाड्याकडे निघाली होती. बसमध्ये वाड्यातील स्वामी कॉलेज व पी.जे.शाळा व महाविद्यालयाचे जवळपास 60 विद्यार्थी आणि काही कामगार प्रवास करत होते. चालक भरधाव वेगाने गाडी चालवत होता. बस जांभूळपाडा येथे पोहचताच चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बस स्पीड ब्रेकरवर आदळून झाडाला धडकली आणि रस्त्याच्या कडेला शेतात घुसली. सुदैवाने बस चिखलात रुतल्याने पलटी झाली नाही अन्यथा मोठी जिवितहानी झाली असती.
या अपघातात 50 हून अधिक विद्यार्थी आणि काही कामगार जखमी झाले आहेत. काही विद्यार्थ्यांच्या डोक्याला, पायाला, कमरेला, हाताला मार लागला असून जखमींवर वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर रामजी प्रसाद व सुमन प्रसाद या दोन गंभीर जखमी झालेल्या कामगारांना ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून बस चालकाला ताब्यात घेतले आहे. एसटी महामंडळ या घटनेचा तपास करत आहे. जखमींच्या उपचारासाठी महामंडळाकडून प्रत्येकी एक हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे.