राज्यात दिवळीत एसटी कामगारांनी संप पुकारला होता. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागला होता. तर एसटी महामंडळाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले होते. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हा संप मिटला होता. या संपानंतर एसटी महामंडळाने सुमारे 5 हजार कंत्राटी चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या सदर्भात पुढील 2 ते 3 दिवसात जाहिरात निघण्याची शक्यता आहे.
महामंडळाने एसटी कामगारांच्या बेमुदत संपानंतर कंत्राटी चालकांची भरती केली होती. मात्र, संप मिटताच या कंत्राटी चालकांना कामावरुन कमी करण्यात आले होते. तर काहींना मुतदवाढ देण्यात आली होती. त्यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, लातूर, बीड, जालना, उस्मानाबाद विभागांतील कंत्राटी चालकांचा समावेश होता. त्यामुळे पाच हजार कंत्राटी चालकांची खासगी कंपनीमार्फत भरती करण्यात येणार आहे. ही भरती टप्प्याटप्प्याने होणार आहे.
काय म्हणाले महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने –
राज्यातील कोकण, पुणे विभागासह अन्य काही विभागांत एसटीच्या चालकांची कमतरता आहे. त्यामुळे अनेकदा गाड्या स्थानकातच पडून राहतात. त्यामुळे, महामंडळाकडून नव्याने 5 हजार कंत्राटी चालकांची भरती करण्यात येणार आहे. सध्या परीक्षा देऊन प्रतीक्षा यादीवर असलेले कर्मचारी हे कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून एसटीत येऊ शकतात. एसटीतील निवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्यास, लवकरच प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना संधी मिळेल, याबाबतच निर्णय लवकरच होईल, असे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगीतले .