मुंबई : कंत्राटी भरतीबाबतचा शासननिर्णय रद्द करण्यात आला असला तरी, या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. हा निर्णय मागील सरकारच्या काळात घेण्यात आल्याचा दावा सत्ताधारी करत असले तरी, तेव्हाचे मंत्री आता देखील सरकारमध्ये असल्याचे विरोधाकांनी निदर्शनास आणून दिले आहे. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करून भाजपा तसेच उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका करताना आता सत्तेत सहभागी असलेल्या त्यावेळच्या मंत्र्यांची यादीच दिली आहे.
हेही वाचा – शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची लाज काढण्याइतके मोठे झालात? आव्हाडांचे मुंडेंवर शरसंधान
कंत्राटी भरतीचा शासननिर्णय रद्द करण्यात आल्याची घोषणा करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे पाप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे असल्याचा आरोप केला आहे. राज्यातील युवकांची दिशाभूल केल्याबद्दल, स्वत:चे पाप दुसऱ्यांच्या माथी मराल्याबद्दल महाविकास आघाडीने माफी मागितली पाहिजे. माफी मागणार नसतील तर आमच्या पक्षांना त्यांना रोज जनतेत जाऊन उघडे करावे लागेल, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
भाजप म्हणजे काखेत कळसा गावाला वळसा. माफीनामा…! माफीनामा…!! असे ओरडत भाजपने ढोंगीपणा करून जनतेची दिशाभूल करणे अगोदर बंद करावे. कॉंग्रेस राष्ट्रवादी सरकारने आपल्या कार्यकाळात कधीही कंत्राटी तत्वावर कार्यकारी पदे भरली नव्हती. कंत्राटी पद्धत कुणी सुरु केली याचा शोध भाजपाने जरुर…
— Supriya Sule (@supriya_sule) October 21, 2023
या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट केले आहे. भाजपा म्हणजे काखेत कळसा गावाला वळसा. ‘माफीनामा! माफीनामा!’ असे ओरडत भाजपाने ढोंगीपणा करून जनतेची दिशाभूल करणे अगोदर बंद करावे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने आपल्या कार्यकाळात कधीही कंत्राटी तत्वावर कार्यकारी पदे भरली नव्हती. कंत्राटी पद्धत कुणी सुरू केली, याचा शोध भाजपाने जरूर घ्यावा, असे आवाहनच त्यांनी दिले आहे.
हेही वाचा – मुंबईतील वायू प्रदूषणाची सुरुवात फडणवीस सरकारच्या काळातच, ठाकरे गटाचा थेट आरोप
राज्यातील विद्यार्थी आणि तरुणांनी संघटीतपणे केलेल्या विरोधापुढे हे सरकार झुकले आहे. आता आपले अपयश लपविण्यासाठी माफिनाम्याचे खूळ भाजपाने काढले आहे. उपमुख्यमंत्री महोदयांना जुने संदर्भ काढून आपल्या चुकांचे खापर पूर्वसूरींवर फोडायची खोड आहे. उगाच वडाची साल पिंपळाला लावण्याचे उद्योग करण्यापेक्षा ज्यांच्या मांडीला मांडी लावून सरकार चालविता त्यांच्याशी दोन शब्द बोलून घेतले असते तरी, आपण हे ‘हवाबाण’ सोडण्याची हिंमत केली नसती, असे खासदार सुळे यांनी सुनावले आहे.
कंत्राटी भरतीचा निर्णय 2011 व 2021 सालच्या मंत्रिमंडळाने केला म्हणायचे आणि दुसरीकडे त्याच मंत्रिमंडळातील मंत्र्यांसोबत सत्ता उपभोगायची. या स्वार्थासाठी राजकीय पोळी भाजण्याच्या भाजपा वृत्तीचे कार्ड महाराष्ट्राच्या जनतेपुढे मुळीच चालणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.