Sushma Andhare beating case बीड/मुंबई – बीडमध्ये शिवसेनेच्या (ठाकरे गट) महाप्रबोधन यात्रेआधी स्थानिक राजकारण पेटले आहे. बीडच्या कन्या असलेल्या सुषमा अंधारेंना त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून त्यांच्याच शहरात मारहाण झाल्याचे समोर आले आहे. प्रबोधन यात्रा सभेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या सुषमा अंधारे यांना जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव (Appasaheb Jadhav) यांनी मारहाण केल्याचे म्हटले जात आहे. जाधव यांनी स्वतः व्हिडिओ तयार करुन याची माहिती दिली. यानंतर जिल्हा प्रमुखासह सह संपर्कप्रमुख धोंडू पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. यावर अंधारेंनी फेसबुक लाईव्हवर येऊन स्पष्टीकरण दिले आहे.
काय आहे प्रकरण
गुरुवारी सायंकाळी सुषमा अंधारे (Sushma Andhare), जिल्हाप्रमुख जगताप आणि जाधव हे माने कॉम्प्लेक्स येथील सभास्थळाची पाहणी करत होते. त्यावेळी जाधव आणि वरेकर यांच्यात चकमक उडाली. दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले आणि बाचाबाची सुरु झाली. यावेळी जाधव यांच्या गाडीची काचही फोडण्यात आली. तिथे उपस्थित कार्यकर्त्यांनी हे भांडण सोडवले आणि त्यानंतर दोघेही तिथून निघून गेले. या प्रकरणाची स्थानिक पोलिसांत नोंद झालेली नाही.
यानंतर आप्पासाहेब जाधव यांनी रात्री उशिरा एक व्हिडिओ शूट केला. यात त्यांनी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर पैशांची मागणी करण्याचा आरोप केला. यावेळी मी त्यांना दोन चापटीही मारल्याचा दावा जाधव यांनी व्हिडिओत केला आहे. या प्रकरणाची शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी गंभीर दखल घेतली असून आप्पासाहेब जाधव आणि सह संपर्क प्रमुख धोंडू पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. दरम्यान, सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर लाईव्ह येऊन आपण सुखरुप आहोत. कोणीही मारहाण केलेली नाही, असे सांगितले आहे.
महाप्रबोधन यात्रा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. ग्रामीण महाराष्ट्रातली शेवटची समारोपिय सभा वीस मे 2023 रोजी बीड येथे संपन्न होत आहे.
विशेष या सभेला कौतुक करण्यासाठी नेते सन्माननीय @rautsanjay61 साहेब आवर्जून उपस्थित राहत आहे. @OfficeofUT @ShivsenaUBTComm @ShivSenaUBT_ pic.twitter.com/cOMCUhBYT9— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) May 18, 2023
महाप्रबोधन यात्रेचा (Mahaprabodhana Yatra) समारोप बीडमध्ये होत आहे. यासाठी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) उपस्थित राहाणार आहेत. त्याआधी शिवसेनेत झालेला हा राडा पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आणणारा ठरला आहे. त्यामुळे शिवसेनेने आधी शिवसैनिकांचे प्रबोधन करावे आणि नंतर जनतेचे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.