ठाणे पोलीस आयुक्तांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. त्या कारवाईत वर्तकनगर पोलिसांनी सुमारे २० वर्षांहून अधिक काळ फरार असलेल्या आरोपींना अटक करण्यात यश आले आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ यांनी शनिवारी दिली.
लक्ष्मण बोहरीलाल गुहेर या २२ वर्षीय आरोपीने चिरागनगर येथील जगदाळे चाळमधील संदेश मोरे यास हॉकी स्टीक आणि दगडाने मारहाण केली होती. १९९८ पासून तो फरार होता. श्रीहरी त्र्यंबक भीसे या २० वर्षीय आरोपीने गणेशनगर पाईपलाईन परिसरातील गणपत जाधव यांच्या मुलीची छेड काढून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला होता. मात्र आरोपी १९९५ पासून फरार होता.
मोहन रेवजी रेवंदरे यांच्याकडे काम करीत असताना दुधाच्या धंद्यातील रक्कम घेऊन आरोपी सुनील शंकर जोंधळे यांने रेवंदरे यांची फसवणूक केली. वर्तकनगर येथील समता नगर येथून १९९३ पासून हा आरोपी फरार होता. या तिन्ही आरोपीना न्यायालयाने जाहिरनाम्याद्वारे फरारी घोषित केले होते. ते आपली ओळख बदलून नवी मुंबई, नाशिक, नांदेड येथे वास्तव्य करीत होते. त्यांच्याबद्दल माहिती मिळाली असता वर्तकनगर पोलिसांनी कारवाई करीत त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले आहे.