महाड आगारात बोरीवली रत्नागिरी एस.टी.बस चालकास मारहाण करून फरार झालेल्या आरोपींना पकडण्यात महाड शहर पोलिसांना यश आले असून हे सर्व आरोपी नडगावतर्फे बिरवाडी गावातील आहेत. सदर घटना फेब्रुवारी महिन्यात घडली होती.
महाड शहर पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २५ फेब्रुवारी २०१९ रोजी बोरीवली-रत्नागिरी या बसवरील वाहक दीपक रवींद्र जाधव (३२) रा.कोल्हापूर याला महाड तालुक्यातील नडगाव तर्फे बिरवाडी या गावातील ६ जणांनी महाड आगारात मारहाण केली होती. या बसला मासिक, त्रैमासिक पासची सुविधा नसल्याने वाहक जाधव यांनी पासधारकांना बसमध्ये प्रवेश करण्यास मनाई केली. तरी अल्पवयीन असलेल्या अभिषेक सखाराम आंब्रे या तरुणाने जबरदस्तीने बसमध्ये प्रवेश केला. अभिषेक हा इंदापूर येथे उतरला आणि दुसर्या बसने येवून माणगावमध्ये पुन्हा बोरीवली-रत्नागिरी या बसमध्येच प्रवेश केला. वाहकास दमदाटी केली. त्यानंतर अभिषेकने सौरभ रमेश आंब्रे (१९), ओमकार युवराज मांडे (२१), मनेश कृष्णा मांडे (२४), सुरज रमेश आंब्रे (२३), सखाराम मारुती आंब्रे (४९) यांना महाड आगारात बोलावून घेतले आणि वाहक दीपक जाधव आणि चालकास मारहाण केली. त्यानंतर हे सर्व जण पळून गेले होते.
याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात वाहक दीपक जाधव यांनी फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार या आरोपींना तपासाअंती अटक करण्यात आली आली. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.