देशभरातील सर्वाधिक कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले असून त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे मुंबई, ठाणे, रायगड आणि पुण्यामध्ये सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर या सर्व ठिकाणी लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आले असतानाही रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाढवलेले लॉकडाऊन, कडक नियम असतानाही रुग्ण कमी होत नसल्याने कोरोना निवारण्याचे केंद्रीय पथक महाराष्ट्राच्या दौर्यावर पाठविले आहे.मुंबईसारख्या मेट्रेसिटीत कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या ही चिंतेची बाब असल्याचे केंद्रीय गृह विभागाने सोमवारी म्हटल्याने लवकरच लष्कराकडे हि शहरे देण्याशिवाय पर्याय दिसत नाही. त्यामुळे आठवडाभरात मुंबई आणि ठाणेलगतच्या परिसरात लष्कर बोलवावे लागल्यास आश्चर्य वाटायला नको अशी भीती एका अतिरिक्त मुख्य सचिवाने आपलं महानगरकडे व्यक्त केली.
पुण्यात रविवारी मध्यरात्रीपासून 27 एप्रिलपर्यंत पूर्ण शहरच लॉकडाऊन करण्यात आले आहे. तर मुंबईत राज्य राखीव पोलीस दल उतरवण्याची मागणी होत आहे. मुंबई आणि पुण्याची मोठी लोकसंख्या, झोपडपट्ट्या, गर्दीची ठिकाणे, बेशिस्तीचे मोठे प्रमाण अशा एक न अनेक कारणांमुळे कोरोनाला आळा घालणे खूप कठीण होऊन बसले आहे. यामुळे सर्वाधिक फटका बसलेले पुणे,ठाणे आणि मुंबई हे तिन्ही जिल्हे सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहेत.
थेट केंद्रीय गृहविभागाने याबाबत चिंता व्यक्त केली आहे. मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या ३ हजारांच्या वर गेली असून १३९ मृत्यू झाले आहेत. तर पुण्यात ८०० हून अधिक कोरोनाग्रस्त रुग्ण असून ५१ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. या पार्श्वभूमीवर या दोन्ही जिल्ह्यांमधली परिस्थिती गंभीर झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे केंद्रीय गृह विभागाने प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचे सोमवारी परिपत्रक काढले आहे.
केंद्र सरकारला अहवाल सादर होणार
मुंबई आणि पुण्यातल्या परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृह विभागाने दोन पथकांची नियुक्ती केली आहे. ‘मुंबई आणि पुण्यात प्रत्यक्ष जाऊन तिथल्या परिस्थितीचा व्यापक आढावा घेण्यासाठी 2 पथकांची नियुक्ती करण्यात येत आहे. हे गट मुंबई आणि पुणे जिल्ह्याला भेट देऊन तिथल्या परिस्थितीसंदर्भात राज्य सरकारला निर्देश देतील. शिवाय, याबाबत तिथल्या परिस्थितीचा अहवाल केंद्र सरकारला सादर करतील’, असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.