मुंबई – शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच आज पुन्हा एक मोठी घोषणा केली आहे. ५ ऑक्टोबरला दसरा मेळावा झाल्यानंतर ९ ऑक्टोबर रोजी ठाण्यातील टेंभी नाका येथे उद्धव ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत. या सभेतूनच महाप्रबोधन यात्रेला सुरुवात होणार आहे. तर, या महाप्रबोधन यात्रेची सांगता कोल्हापुरातील बिंदू चौकातून होणार आहे.
शिवाजी पार्कावर होणाऱ्या दसरा मेळाव्याचा झंझावात कायम राहण्याकरता महाप्रबोधन यात्रा सुरू करण्यात येणार आहे. त्याची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या ठाण्यातील टेंभी नाक्यापासून होणार आहे. यानंतर उद्धव ठाकरे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन शिवसेनेच्या प्रचार आणि प्रसाराचं काम करणार आहेत, असं सांगण्यात येतंय.
महाप्रबोधन यात्रेदरम्यान पुणे, नाशिक, नागपूर आणि कोल्हापूर अशा प्रमुख शहरांमध्ये उद्धव ठाकरे भाषण करणार असल्याचंही सांगण्यता येतंय. तसंच, आदित्य ठाकरेही ठिकठिकाणी भाषणे करणार आहेत. या दौऱ्यांमुळे शिवसेनेला पुन्हा उभारी येऊन बळ मिळण्याची शक्यता आहे. लवकरच पालिकेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. या निवडणुकांच्या रंगीत तालिमाला महाप्रबोधन यात्रेने सुरुवात होणार आहे.
५ ऑक्टोबर रोजी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कात होणार आहे. शिवसेनेत बंड झाल्यानंतरचा हा पहिला दसरा मेळावा आहे. त्यामुळे या मेळाव्यातून शिंदे गट आणि भाजपावर ठाकरे कसा निशाणा साधतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.