आम्हाला काँग्रेसशी हातमिळवणी करण्यास भाजपनेच भाग पाडले. आज आमचे काही लोक गळ्यात पट्टा बांधून त्यांच्याकडे गेले आहेत. हे आमचे हिंदुत्व नाही. गळ्यात पट्टा बांधून कोणाची तरी गुलामगिरी करणे हे शिवसेनाप्रमुखांनी मला शिकवले नाही. ते मी कधीच करणार नाही. महाविकास आघाडी स्थापन केल्यावर मी हिंदुत्व सोडल्याची टीका भाजप नेते करतात. आता तुमच्याशी संवाद साधल्यावर उत्तर भारतीयांच्या मागे लागले, असे ते म्हणतील, अशा शब्दांत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचा समाचार घेतला. रविवारी गोरेगाव येथे उत्तर भारतीय समाजाच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी उत्तर भारतीयांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, आम्ही काँग्रेससोबत गेलो म्हणजे हिंदुत्व सोडले असे होत नाही. काल परवा पंतप्रधान नरेंद्र मोदी बोहरा समाजाच्या कार्यक्रमात येऊन आपली पोळी भाजून गेले. बोहरा समाजाच्या विरोधात मी नाही, ते चांगले लोक आहेत, पण मी तेथे गेलो असतो आणि त्यांना चांगले म्हटले असते तर मी हिंदुत्व सोडले अशी टीका झाली असती, पण मोदी यांचे हृदय किती विशाल आहे याचे दाखले दिले जात आहेत. मी कधीही हिंदू-मुस्लीम, मराठी अमराठी असा भेद केला नाही.
भाजपच्या पडत्या काळात माझ्या वडिलांनी भाजपचे पंतप्रधान वाचवले होते. अटल बिहारी वाजपेयी यांनी राजधर्माचे पालन करूया असे म्हटले होते. वाजपेयींनी राजधर्माचे पालन केले असते तर आज जे बसले ते पंतप्रधानपदी बसलेच नसते. आमची 25 वर्षे युती होती, त्यात आम्हाला काय मिळाले? ते दिल्लीत जावून बसल्यावर त्यांना बाकीच्यांची गरज उरली नाही. भाजपने 2014 पूर्वीच युती तोडली. आमची युती तुटली तेव्हा आणि आताही आम्ही हिंदू आहोत. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. आमचे हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
पार्सल माघारी जात आहे
राज्यपाल कोश्यारींच्या राजीनाम्याबाबत बोलताना, आज चांगला मुहूर्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक करण्यासाठी उत्तर भारतातील अर्थात काशीमधून गागाभट्ट आले होते. आज आम्ही उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात आलो असताना शिवाजी महाराजांचा अपमान करणारे पार्सलने माघारी जात आहे, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.