संपूर्ण देशासह आता राज्यात सुद्धा ओमिक्रॉन व्हेरियंटने हातपाय पसरायला सुरूवात केलीय. डेल्टापेक्षाही ओमिक्रॉन व्हेरियंट मोठ्या वेगानं पसरत आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. तरीदेखील १ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्यास राज्य सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे. परंतु ओमिक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे शाळा पुन्हा बंद करु अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होत होती. परंतु आता वर्षा गायकवाड यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
ओमिक्रॉनमुळे शाळा बंद करण्याचा निर्णय नाही
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, ओमिक्रॉनमुळे शाळा बंद करण्याचा निर्णय नाही. जास्त रूग्ण आढळल्यास स्थानिक प्रशासन निर्णय घेईल. असंही त्यांनी स्पष्ट केलंय. सरसकट शाळा बंद करण्यासंदर्भात मी विधान केलं नाही. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमातून शिक्षण सुरू राहणार आहे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
सरसकट शाळा बंद होणार असं कुठलंही विधान केलेलं नाही
पुढे त्या म्हणाल्या की, महाराष्ट्रातील शाळा बंद करण्यात येतील, अशा प्रकारच्या वार्ता गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. त्यामध्ये माझं नाव घेण्यात आलं होतं. शाळेच्या बाबतीत आम्ही स्थानिक पातळीवरील शिक्षण अधिकारी, आयुक्त आणि जिल्हाधिकारी असं एकत्र येऊन कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेत असतात. परंतु सरसकट शाळा बंद करण्याबाबत कुठलंही विधान मी केलेलं नव्हतं, असं गायकवाड म्हणाल्या.
दरम्यान, राज्यात ११ ओमिक्रॉन बाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर मुंबईत ८ रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. राज्यातील ओमिक्रॉन रूग्णांची संख्या ६५ वर पोहोचली आहे. त्यामुळे देशासह राज्यात सुद्धा ओमिक्रॉनचा धोका वाढत आहे.
हेही वाचा : Maharashtra school : …तर महाराष्ट्रात शाळा पुन्हा बंद होणार; शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत