१३५ कोटींच्या भारताला आणखी लोकांची गरज नाही. देशात बाहेरून लोक आणण्याची आवश्यकता आहे का? असा प्रश्न राज ठाकरे यांनी पुणे येथील पत्रकारपरिषदेत विचारला. आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गेले दोन दिवस ते पुणे दौऱ्यावर आहेत. कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
राजकीय पक्षांनी विनाकारण राजकरण करू नये, नागरिकत्व कायद्याचं भाजपानंही राजकारण करू नये, स्थानिक मराठी मुस्लिम कधीच आंदोलन करत नाही. केंद्राने आधी इथल्या लोकांच्या चिंता मिटवा. बाहेरून आलेल्या लोकांसंदर्भात पोलिसांना माहिती आहे. बाहेरच्या लोकांना उगाच पोसण्याची गरज नाही. आधी बांग्लादेश आणि पाकिस्तानातून आलेल्या लोकांना हाकललं पाहिजे. भारत ही धर्मशाळा नाही. आपल्या देशात जे मुस्लिम नागरिक राहतात त्यांना असुरक्षित वाटण्याचं कारण काय? सर्व लोकांना सामावून घेण्यासाठी भारत ही काही धर्मशाळा नाही. अन्य देशातून आलेल्या लोकांना हाकलवून दिलं पाहिजे. माणुसकीचा ठेका हा काही भारतानंच घेतलेला नाही. इकडे राहत असलेल्यांची चिंता मिटत नाही, तर बाहेरून आणखी लोकं का हवी, असा सवालही त्यांनी केला.
मंदीवरुन लक्ष हटवण्याचा डाव
सध्या देशात आर्थिक मंदीचं वातावरण आहे. अजून आपल्याला मंदीचा सामना करायचा आहे. देशाच्या ढासळत्या आर्थिक स्थितीवरुन नागरीकांचे लक्ष विचलित करण्यासाठी सुधारित नागरिकत्व कायदा, एनआरसी सारखे मुद्दे समोर आणले. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी हे करुन दाखवलं असे राज ठाकरे म्हणाले.
आधार कार्डाची गरज काय?
जर भारतात मतदानासाठी आधारकार्ड चालू शकते तर मग नागरिकत्वासाठी सिद्ध करण्यासाठी आधारकार्ड का चालू शकत नाही? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. मग आधारकार्डसाठी लोकांना तासनतास रांगेत उभे राहून काय उपयोग झाला.