एक्झिट पोलचं भाकित खरं ठरवतानाच भाजपनं यंदाच्या निवडणुकीत मोठा विजय संपादित केला. सत्ताधाऱ्यांकडून तर गेल्या वेळची लाट आता त्सुनामी झाल्याचं सांगितलं गेलं. पण या त्सुनामीलाही शरद पवारांच्या बारामतीच्या बालेकिल्ल्याला धक्का लावता आलेला नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. बारामतीमधून सुप्रिया सुळे सलग तिसऱ्यांदा संसदेत खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. भाजपच्या तिकिटावर लढणाऱ्या कांचन कुल यांना तब्बल दीड लाखाहून अधिक मतांनी पराभूत करत सुप्रिया सुळेंनी पवार कुटुंबाचा गेल्या ५० दशकांपासून शाबूत असलेला बालेकिल्ला कायम राखला आहे. या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या विजयाची आणि पराभवाचीही कारणमीमांसा सुरू झाली आहे. पण सुप्रिया सुळेंच्या सलग तिसऱ्या विजयामागचं काय गणित आहे?
कसा आहे बारामती लोकसभा मतदारसंघ? वाचा!
का जिंकल्या सुप्रिया सुळे?
१) परंपरागत मतदारसंघ – बारामतीमधला मतदार गेल्या ५० वर्षांपासून पवार कुटुंबियांशी एकनिष्ठ राहिला आहे. त्यामुळे इथे विजयाची हमखास खात्री सुप्रिया सुळेंना होती.
२) मतदारांशी थेट संपर्क – बारामती मतदारसंघातील दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर आणि खडकवासला या ६ मतदारसंघांमधले साखर कारखाने, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून सुप्रिया सुळेंचा मतदारांशी थेट संपर्क राहिला आहे.
३) सामाजिक कार्य – या मतदारसंघातल्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून सुप्रिया सुळेंनी समाजकार्य केल्यामुळे त्यांची चांगली प्रतिमा मतदारांपर्यंत पोहोचली आहे. विशेषत: महिला आणि तरुणांसाठी त्यांनी काम केल्यामुळे या भागातल्या नवमतदारांमध्ये त्यांची प्रतिमा चांगली राहिली आहे.
४) हर्षवर्धन पाटलांची समजूत – इंदापूर तालुक्यातल्या हर्षवर्धन जाधव यांची नाराजी सुप्रिया सुळेंसाठी डोकेदुखी ठरू शकली असती. मात्र, निवडणुकांपूर्वीच त्यांच्याशी चर्चा करून मनोमीलन घडवून आणल्यामुळे त्यांच्या दृष्टीने तो प्लस पॉइंट ठरला.
५) धनगर मतांचं टळलेलं विभाजन – २०१४च्या निवडणुकीमध्ये महादेव जानकरांनी धनगर समाजाचं एकीकरण करून सुप्रिया सुळेंसमोर मोठं आव्हान उभं केलं होतं. यंदा मात्र महादेव जानकरांना युतीने उमेदवारीच न दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात धनगर मतं सुळेंच्या बाजूने वळली.