हिवाळा सुरु होऊन वातावरणात कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. ही संपूर्ण थंडीची लाट महाराष्ट्रभर उसळत आहे. उत्तरेकडील भागात आलेल्या थंडीच्या लाटेचे परिणाम महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये कालच्या तुलनेत आज थंडीचा पारा घसरला आहे. महाबळेश्वरातील वेण्णा लेक परिसरात मध्यरात्री शून्य अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर सकाळी सहा वाजताच्या दरम्यान, वेण्णालेकवर तापमानाची नोंद एक अंश तापमानाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरमधील तापमान चार अंशानी घसरले असून, दवबिंदू गोठले होते. पर्यटकही या गुलाबी थंडीचा आनंद लुटत असून, महाबळेश्वरमध्ये मिनी काश्मीरचा आभास होत आहे. महाराष्ट्रासह इतर भागातही थंडीचे प्रमाण वाढले आहे. अनेक ग्रामीण भागात दवबिंदू गोठल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच, महाराष्ट्रातील बहुतांश भागांत ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्रात विदर्भ वगळता अनेक भागात हवामान कोरडे आहे. महाराष्ट्रात मुंबईसह कोकण भागातही किमान तापमानात दोन दिवसांपासून घट पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र,सोलापूर,नांदेड,वाशिम आणि महाबळेश्वरातील किमान तापमान हे सरासरीखाली आहे. थंडीमुळे दुर्गम भागातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच, महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी पावासासह गारपिट झाल्याचे पाहायला मिळत आहे. या गारपिटीचा फटका नागपूर जिल्ह्यासह रामटेक तालुक्याला बसला आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवरही मोठे संकट कोसळले आहे.
या थंडीच्या कडाक्याची झळ नंदुरबार जिल्ह्यात जाणवत आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी शेकोटी पेटायला सुरुवात झाली आहे. सातपुड्याच्या दुर्गम भागातील जनजीवन थंडीमुळे विस्कळित झाले आहे. महाबळेश्वरनंतर राज्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबारच्या तोरणमाळ येथे पारा सात अंशावर घसरलाय. थंडीमुळे अनेक बाजार बळावत चालले आहेत.
हेही वाचा – उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूरची निवडणूक राष्ट्रवादी लढविणार