१० दिवसांच्या पाहूणचारानंतर गणपती बाप्पा आपल्या घरी परत गेले. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषात बाप्पाला निरोप देण्यात आला. मुंबईत लालबागच्या राज्यातचे विसर्जन झाले. पवई तलावामध्ये अजूनही गणपती बाप्पाचे विसर्जन सुरु आहे. आतापर्यंत अनेक सार्वजनिक आणि घरगुती गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. मुंबईमध्ये रविवार सकाळपासून ते सोमवारी सकाळपर्यंत ४१ हजार ७८० गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये ७ हजार १४८ सार्वजनिक गणेशोत्व मंडळाचे बाप्पा, ३४ हजार ४६० घरगुती गणपती बाप्पा आणि १७२ गौरींचे विसर्जन करण्यात आले आहे.
कृत्रिम तलावात विसर्जनाला भर
यंदाच्या वर्षी मुंबईमध्ये गणेशभक्तांनी मोठ्याप्रमाणात कृत्रिम तलावामध्ये गणपती विसर्जन करण्यावर भर दिला होता. मुंबईतील अनेक सार्वजनिक गणेशोत्वस मंडळांनी देखील कृत्रिम तलावामध्ये गणपती विसर्जन केले. यंदा मुंबईमध्ये कृत्रिम तलावामध्ये २९७ सार्वजनिक गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. ४ हजार ५९ घरगुती गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले तर २० गौरीचे देखील या कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. असे एकूण ४ हजार ३७६ विसर्जन कृत्रिम तलावामध्ये झाल्याचे समोर आले आहे.