रुग्णाला जर उपचारांदरम्यान काहीही त्रास झाला किंवा शस्त्रक्रियेचा खर्च प्रमाणापेक्षा जास्त सांगितला तर त्याविरोधात एमएमसी म्हणजेच महाराष्ट्र मेडिकल काउंन्सिलकडे सर्वसामान्य तक्रारी देऊ शकतात. पण, अनेकदा नातेवाईक , रुग्ण आणि डॉक्टरांच्या अपुऱ्या संवादातून गैरसमज निर्माण होतात. याच गैरसमजातून एमएमसीकडे तक्रारी केल्या जातात. ज्याचं प्रमाण ८० टक्क्यांपर्यंत आहे, असं महाराष्ट्र मेडिकल काउंन्सिल (एमएमसी) चे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी ‘माय महानगर’शी बोलताना सांगितलं आहे.
तक्रारींमध्ये ३० ते ४० टक्क्यांनी वाढ
जवळपास ८० टक्के येणाऱ्या तक्रारी या डॉक्टर आणि नातेवाईकांमध्ये अपुऱ्या संवादामुळे दाखल झालेल्या आहेत. डॉक्टर रुग्ण आणि नातेवाईकांना त्यांच्या ट्रिटमेंट बद्दल किंवा रुग्णाच्या प्रकृतीबद्दल समजावून सांगत नाहीत. त्यांना वेळ देत नाहीत. त्यांची नीट विचारपूस करत नाही. त्यातूनच डॉक्टरांवर हल्ले होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. याविषयी एमएमसी अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी ‘माय महानगर’ शी बोलताना सांगितलं की, ‘महिन्याला महाराष्ट्रातून आमच्याकडे डॉक्टरांविरोधात ३० ते ४० तक्रारी वेगवेगळ्या विषयांसाठी लोकांकडून दाखल होत असतात. त्यापैकी जवळपास ८० टक्के हे रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये होणाऱ्या अपुऱ्या संवादातून आणि त्यातून होणाऱ्या गैरसमजातून केल्या जातात. तर २० टक्के तक्रारी या डॉक्टरांनी चुकीच्या दिलेल्या उपचारांमुळे आणि जास्तीचा खर्च लावल्यामुळे येतात. याआधी वर्षातून २० ते ३० तक्रारीही येत नव्हत्या. पण आता जनजागृती वाढली आहे. त्यामुळे तक्रारी येण्याचं प्रमाणही वाढलं आहे. ‘
एमएमसीकडून अॅपवर डिक्लेरेशन फॉर्म जाहीर
नुकतंच जे. जे. रुग्णालयात डॉक्टर्स, नर्सवर झालेल्या हल्ल्यामुळे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयानेही खास डॉक्टरांसाठी रुग्णांशी संवाद याविषयी व्याख्यानाचं आयोजन केलं होतं. एमएमसीनेदेखील तक्रारी नोंदवण्यासाठी सुरू केलेल्या अॅपवर डिक्लेरेशन फॉर्म जाहीर केला आहे. तो फॉर्म डाऊनलोड केल्यानंतर एखाद्या डॉक्टर विरोधात तक्रारी दाखल करता येऊ शकतात.