मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्य सरकारला अल्टिमेटम दिल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर भोंगे हटवले जाऊ नयेत यासाठी मशिदींच्या व्यवस्थापकांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. मुंबईतील ८०३ मशिदींनी भोंगे लावण्यासाठी पोलिसांकडून रितसर परवानगी घेतल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनीही भोंगे लावण्यासाठी काही अटी घातल्या आहेत.
औरंगाबाद येथील सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी राज्य सरकारला ४ मे पर्यंतची मुदत दिली आहे. यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीसही अॅक्शन मोडमध्ये आले असून राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. तर पोलिसांनी हजारो मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा पाठवल्या आहेत. भोंग्यावरून वातावरण तापले असतानाच मुंबईतील मशिदी रितसर परवानी घेण्यासाठी पुढे आल्या आहेत.
मुंबईतील १ हजार १४४ मशिदींपैकी आतापर्यंत ८०३ मशिदींनी भोंगे लावण्यासाठी पोलिसांकडून परवानगी घेतली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याच्या अटीवरच पोलिसांनी ही परवानगी दिली आहे. सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत लाऊडस्पीकरचा वापर केला जाईल आणि डेसिबलची मर्यादा पाळण्याची अट पोलिसांना घातली आहे. या प्रमुख अटींवर मशिंदीना भोंगे लावण्याची परवानगी देण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.