घरमुंबईभिवंडीत पाच दुचाकी पेटवल्या

भिवंडीत पाच दुचाकी पेटवल्या

Subscribe

गाड्या जाळल्याची दोन महिन्यातील सातवी घटना

भिवंडी शहरातील दिवांशा दर्गा, कामतघर, भंडारी कंपाऊंड आदी ठिकाणी मोटारसायकल जाळण्याचे प्रकार महिनाभरापासून सुरू असतानाच पिराणीपाडा येथील रहिमत कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये मंगळवारी पहाटे पाच मोटारसायकलींना आग लावून जाळल्याची घटना घडली. या घटनेने संवेदनशील समजल्या जाणार्‍या शांतीनगर, पिराणीपाडा परिसरात भीती पसरली आहे. शहरात मोटारसायकली जाळण्याची दोन महिन्यातील ही सातवी घटना असल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.

शहरातील पिराणीपाडा येथील रहिमत कॉम्प्लेक्सच्या तळमजल्याच्या पार्किंगमध्ये शाहरुख खान, मुस्ताक सैय्यद , जग्गू शेख , कामरान अंसारी आदींनी त्यांच्या पाच दुचाकी पार्क करून ठेवल्या होत्या. त्यामध्ये 3 स्कुटी , 1 होंडा एव्हिएटर व 1 होंडा पॅशन आदी दुचाकींचा समावेश आहे. या पार्क केलेल्या पाच मोटारसायकली पहाटे 2 वाजताच्या सुमारास अज्ञाताने जाळल्या.

- Advertisement -

स्थानिकांनी आग विझवण्याचे प्रयत्न करून अग्निशमन दलास पाचारण केले. मात्र, स्थानिकांचे प्रयत्न व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचेपर्यंत या आगीत पाचही दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या. या आगीच्या भडक्यात इमारतीच्या भिंतींनाही आगीच्या झळा पोहोचल्याने इमारतीचे नुकसान झाले आहे. या दुचाकी जळीतप्रकरणी स्थानिक रहिवासी शाहरुख खान यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक संदीपान सोनवणे आग लावणार्‍या व्यक्तीचा कसून शोध घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -