गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेना यांच्यात चांगलाच शाब्दिक वाद रंगला होता. त्यानंतर पुन्हा एकदा कंगनाने भिवंडी इमारत दुर्घटनेवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी कंगनाने शिवसेनावर टीका करताना भविष्यातील मुंबईविषयी चिंता व्यक्त केली आहे. तसेच कंगनाने ट्विटरच्या माध्यातातून टीका करताना माझ्या घरावर बेकायदेशीरपणे कारवाई केली जात होती. त्यावेळी तेवढं लक्ष या इमारतीवर दिलं असतं तर जवळपास ५० लोक जिवंत असते असं कंगनाने म्हटलं आहे. तर यावेळी तिने दुर्घटनेची तुलना पुलवामा दहशतवादी हल्ल्याशी केली आहे.
असं म्हणाली कंगना…
“उद्धव ठाकरे, संजय राऊत…जेव्हा माझं घर बेकायदेशीरपणे तोडलं जात होतं, तेव्हा तितकं लक्ष या इमारतीवर दिलं असतं तर आज जवळपास ५० लोक जिवंत असते. पाकिस्तानने केलेल्या पुलवामा हल्ल्यात इतके जवान मारले गेले नाही, जितके निष्पाप तुमच्या निष्काळजीपणामुळे गेलेत. मुंबईचं काय होणार देवालाच माहित” असे ट्वीट करत कंगनाने चांगलाच निशाना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर साधला आहे. कंगनाने ट्विटमध्ये महापालिकेलाही टॅग केलं आहे.
उद्धव ठाकरे, संजय राउत @mybmc जब मेरा घर ग़ैर क़ानूनी तरीक़े से तोड़ रहे थे, उस वक्त उतना ध्यान इस बिल्डिंग पे दिया होता तो आज यह लगभग पचास लोग जीवित होते, इतने जवान तो पुलवामा में पाकिस्तान में नहीं मरवाए जितने मासूमों को आपकी लापरवाही मार गयी, भगवान जाने क्या होगा मुंबई का 🙏 https://t.co/BBkj8APfnu
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 24, 2020
भिवंडीतील तीन मजली इमारत सोमवारी पहाटे कोसळली
भिवंडी शहरातील धामणकरनाका परिसरातील पटेल कंपाऊंड येथील जीलानी बिल्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत ४१ जणांचा बळी गेला असून २५ जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे ६० तास उलटूनही इमारतीचा मलबा बाजूला सारून मृतदेह बाहेर काढण्याचे काम बचाव पथकाकडून सुरू होते. काल बुधवारी पहाटेपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने बचाव पथकासमोर अडथळे निर्माण होत होते. मात्र भरपावसातही मलब्याखालून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरूच राहिले. दरम्यान आतापर्यंत ४१ मृतदेह बचाव पथकाने बाहेर काढले आहे. दरम्यान आज सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी मृतदेह शोध मोहीमेचे बचावकार्य थांबवण्यात आले आहे.