मुंबईच्या धर्तीवर राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात तज्ज्ञ डॉक्टरांना टास्क फोर्सची नेमणुक करा, असे आदेश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज जिल्हाधिका-यांना दिले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगर पालिका आयुक्त यांच्याकडून कोरोना परिस्थितीचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील सहभागी झाले होते.
कोरोनाशी आपण तीन महिन्यांपासून लढत आहोत. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग आपण चांगल्या पद्धतीने रोखला असला तरी मृत्यू दर वाढणे हे बरोबर नाही. आपण लॉकडाऊन शिथिल केला आहे त्यामुळे रुग्णांच्या संख्येत काही जिल्ह्यांत वाढ होत आहे. रुग्ण शोधणे आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क जलदरित्या शोधणे हा एकमेव मार्ग आहे , या कामात अजिबात चालढकल नको, असे मुख्यमंत्री म्हणाले.
अहवाल त्वरीत मिळावेत
दरम्यान प्रयोगशाळांमधून चाचणीचे अहवाल आता लगेच मिळायला पाहिजेत, अशा सूचना असताना काही ठिकाणी ७२ तास लागत असतील तर ती गंभीर बाब आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.