वाहतूक कोंडीचा विपरीत परिणाम मुंबईकरांना भोगावा लागत आहे. रस्त्यांवरील ट्रॅफिक जाममुळे किडनीच्या विकारांमध्ये वाढ होणार असल्याची चिंता नवी मुंबईतील डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. पनवेल ते वाशी हे अंतर अवघ्या २० ते २५ मिनिटांत पार करणाऱ्या कारचालकांना हेच अंतर पार करण्यासाठी तब्बल तीन ते चार तासांचा वेळ लागत आहे. कळंबोली, खारघर, नेरुळ आणि तुर्भे येथे होणाऱ्या अतिवृष्टीमुळे महामार्गावर खड्डे पडले असून गाडीचा स्पीड ७० ते ८० वरून थेट १० ते २० वर ठेवावा लागतो. पण, असा सलग ३ ते ४ तासांचा प्रवास आपल्या शरीरातील मूत्रपिंडाचे म्हणजेच किडन्यांचे आरोग्य बिघडवू शकतो, अशी भीती मुंबईतील डॉक्टरांनी व्यक्त करतात.
मधुमेह, उच्च रक्तदाबाचे रुग्ण किंवा ज्यांना मूत्रपिंडाला पूर्वी जंतूसंसर्ग होऊन गेला आहे किंवा मूतखडा झालेला आहे, अशा नागरिकांनी लघवी थांबवून ठेवल्यास किडनीला जंतुसंसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. यामध्ये महिलांचा प्रामुख्याने समावेश आहे. ट्रॅफिक जाममुळे ऑफिसला अथवा कामाच्या ठिकाणी दोन ते तीन तास उशीर होतो, अशावेळी महिलांची ब्लॅडर म्हणेजच मूत्र साठवण्याची पिशवी भरून जाते. त्यामुळे मूत्रपिंडाला जंतुसंसर्गाचा त्रास होण्यास सुरुवात होते. हीच जीवनशैली जास्त दिवस राहिली, तर संबंधित व्यक्ती नक्कीच आजारी पडू शकते किंवा तिला किडनी विकार होऊ शकतात. – यूरोलॉजिस्ट डॉ. सौम्यन डे, स्टर्लिंग वोक्हार्ट हॉस्पिटल
पावसाळ्यामध्ये आपल्या शरीरातून घामाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे मूत्र पिशवी लगेच भरते आणि ते मूत्र योग्य वेळी शरीराच्या बाहेर गेले नाही तर त्याचे वाईट परिणाम शरीरावर होतात. सायन पनवेलच नाही तर भारतातील सर्वच महामार्गांवर वाहनांची संख्या वाढली असल्याने प्रवासा दरम्यान प्रचंड वेळ लागतो आणि लघवी थांबवावी लागते. त्यामुळे किडनीविकारांमध्ये वाढ होते. याविषयी नागरिकांमध्ये जागरूकता आणणे गरजेचं आहे. – मूत्रविकारतज्ञ डॉ. अमित भोईर
दरवर्षी अडीच लाख डायलिसिसच्या केसेस
खूप वेळ लघवी न केल्यामुळे किडनी विकार होतात. त्यातून किडनी फेल होण्याच्याही घटना घडतात. किडनीने काम बंद केले की, त्या व्यक्तीला फक्त डायलिसिस करणे हा एकच पर्याय उरतो. याविषयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, दरवर्षी जवळपास अडीच लाख रुग्णांची डायलिसिसाठी नोंद केली जाते. त्यामुळे किडनीचे आरोग्य जपण्यासाठी विशेष काळजी घेतली पाहिजे, असा सल्लाही डॉक्टर देतात.
किडनीविकार होऊ नये म्हणून काय कराल?
- दर १५ मिनिटांनी एक वाटी पाणी प्यावे.
- १- १ तासांनी लघवी करावी.
- सतत पेनकिलर्स घेतल्यानेही किडनी विकार उद्भवतात.
- प्रोटिन्सचे अधिक सेवन टाळा
- इन्फेकशनमुळे काही आजार झाले असल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- रक्तदाबात सतत होणारा बदल वेळीच ओळखा.
- रक्तातील वाढलेले साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी गोड खाण्यावर मर्यादा घाला.
- योग्य दिनचर्या, व्यायाम व आहार यामुळे किडनीसह सर्वच विकारांना प्रतिबंध घालता येतो.