मुंबईत आज महाराष्ट्रभरातून मोठ्या संख्येने शेतकरी दाखल झाले असून थेट राजभवनावर शेतकरी आंदोलनाचा मोर्चा धडकणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. त्यासाठी रविवारी सकाळपासूनच मुंबईत शेतकरी मोठ्या संख्येने दाखल होत होते. मुंबईच्या आझाद मैदानमध्ये या शेतकऱ्यांनी ठिय्या टाकला असून दुपारी हे सर्व शेतकरी राज भवनावपर धडकणार आहेत. या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत अनेक नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. मात्र, त्यावर आता राज्यातील विरोधीपक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. ‘ही सगळी ढोंगबाजी सुरू असून बहती गंगा में हाथ धोण्याचा हा प्रकार आहे’, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे.
‘काही पक्ष शेतकऱ्यांना फसवून आंदोलन करण्याचा प्रयत्न करत आहेत. जे लोकं मोर्चाला मदत करतायत, त्यांना माझा सवाल आहे की काँग्रेसने २०१९च्या जाहीरनाम्यात बाजार समिती रद्द करू, असं का म्हटलं होतं. २००६ साली कंत्राटी शेतीचा कायदा त्यांनी महाराष्ट्रात का मंजूर केला? महाराष्ट्रातला कायदा चालतो, देशात नाही, असं का? बाजार समितीच्या बाहेर खासगी परवाने देण्याची सुरुवात महाराष्ट्रात काँग्रेसने केली. ही सगळी ढोंगबाजी सुरू आहे. बेहेती गंगा में हाथ धोण्याचा हा प्रकार आहे. शरद जोशींप्रणीत तिनही शेतकरी संघटनांनी या कायद्यांचं समर्थन केलं आहे’, असं ते म्हणाले.