वसई तालुक्यातील सर्वच मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण करून गाड्या दुरुस्त करण्यात येत असून एका गाडीने रस्त्यावरच पेट घेतल्याची घटना नुकतीच घडली होती. तालुक्यातील विरार, नालासोपारा आणि वसईतील शहरातील सर्वच रस्त्यांवर दुचाकी, चारचाकी दुरुस्त करणार्या गॅरेजवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. भर रस्त्यातच गाड्या दुरुस्त केल्या जात असल्यामुळे तीन पदरीरस्ते दीडपदरी झाले आहेत. या गॅरजेसमध्ये वाहनांचे दुरुस्तीकामे केली जातात. त्यामुळे रस्त्यावरच ऑईल सांडल्याने वाहने घसरून अपघाताला आमंत्रण मिळत आहे.
रस्त्यावरच जुन्या वाहनांची दुकाने
वसईतील शंभरफुटी रोड,नालासोपारातील सोपारा-स्टेशनरोड,पुर्व ते तुळींज-आचोळे आणि विरारमधील बोळींज रस्त्यांवर ठिकठिकाणी गॅरेजेस सुरू आहेत. या गॅरेजसह जुन्या गाड्याही मुख्य रस्त्यांवर विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. तसेच या रस्त्यांच्याकडेला रोपण करण्यात आलेल्या झाडांनाही धोका निर्माण झाला आहे. कोट्यवधी रुपये खर्चून तयार केलेल्या या रस्त्यांवर गाड्यांचे आईल, नट, बोल्ट, तुटलेल्या वायर्स आणि इतर टाकाऊ वस्तू टाकण्यात येत असल्यामुळे हे रस्ते विद्रुप झाले आहेत.
नादुरुस्त गाडी पेटली
नालासोपारात एका घटनेमुळे नागरिक भयभित झाले आहेत. पश्चिमेकडील श्रीप्रस्थ संकुलाच्या चौथ्या रस्त्यावर असलेल्या गॅरेजमध्ये मंगळवारी सकाळी एक मारुती व्हॅन दुरुस्त करण्यात येत होती. त्याचवेळी अचानक या कारने पेट घेतला. त्यामुळे सर्वांचीच धावपळ उडाली. या रस्त्यावर एक शाळा आणि पेट्रोलपंप तसेच अनेक गाड्या पार्क केलेल्या असता. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही हानी झाली नाही. येथील कार्यकर्ते नवीन वाघचौडे आणि योगेश चौधरी यांनी ताबडतोब मदतकार्य सुरु करून अग्निशमन दलाला पाचारण केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.