छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच सहार तथा मरोळ सारख्या अत्यंत दाटीवाटीच्या वस्त्या ज्या पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात येतात. त्या सहार पोलीस ठाण्यातील ३२ जण आतापर्यंत कोरोनाग्रस्त असल्याचे आढळले असून सदर पोलीस ठाण्यातील सर्वांची चाचणी करण्यात यावी, अशी मागणी भाजपा आमदार पराग अळवणी यांनी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांच्याकडे केली आहे.
सहार पोलीस ठाण्याच्या हद्दीत विमानतळ येत असून सद्या परदेशातून येत असलेले प्रवासी तसेच कार्गोमुळे तेथे मोठ्या प्रमाणात लोकांचा वावर आहे. तसेच या पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेला सहार व मरोळ पाईपलाइन सारख्या भागात सुमारे ८० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून यामुळे सुद्धा तेथील कर्तव्य बजावणारे पोलीस कर्मचारी हायरिस्कमध्ये येतात.
मात्र, महापालिकेच्या प्रचलित धोरणानुसार लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तीची चाचणी करण्यात येत नाही. यामुळे असे संभाव्य पॉझिटिव्ह रुग्ण मात्र चाचणी शिवाय शोधता होत नाहीत. यामुळे अशा व्यक्ती एकप्रकारे अदृश्य वाहक असल्यामुळे इतरांना या विषाणूचा संसर्ग होवू शकतो. विशेषत: जर अशी व्यक्ती बाहेर फिरत असल्यास त्यांच्यामुळे प्रादूर्भाव होवू शकतो.
एकाच पोलीस ठाण्यात ३२ अधिकारी/कर्मचाऱ्यांना लागण होणे हे अतिशय गंभीर असून आपल्या योद्धाची काळजी घेणे तसेच मोठ्या प्रमाणात विषाणूची लागण का होते. याबाबत विचार करावा लागेल. तसेच पुढील काळातील या लढाईत पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध असावा या बाबतही नियोजन करावे लागेल आमदार पराग अळवणी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख तसेच पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे.
वर्षभरापूर्वी कर्तव्याच्या वेळा कमी करण्यात आल्या असल्यातरी वर्षानुवर्षे विचित्र कामांच्या वेळामुळे कर्तव्य बजावत असताना येणाऱ्या मानसिक ताणामुळे पोलीस कर्मचाऱ्यांची रोग प्रतिकार शक्ती कमी असू शकते. त्यामुळे एखाद्या लक्षणे नसलेल्या पण पॉझिटिव्ह आढळून आलेल्या कोरोनाच्या रुग्णामुळे अशाच रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना याची लागण होवून त्यांची गंभीर परिस्थिती निर्माण होवू शकते, अशी भीतीही अळवणी यांनी व्यक्त केली आहे.