कोल्हापूर, सांगलीसह राज्यात आलेल्या पुरामुळे अनेकांचे जनजीवन उद्ध्वस्त झाले आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली या भागात अनेक घरं पुरामुळे पाण्याखाली गेली आहेत. यासंबंधी आज, मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूरग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारकडून पूरग्रस्त भागाच्या मदतीसाठी ६ हजार कोटींच्या निधीची मागणी करणारा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. जोपर्यंत हा निधी केंद्र सरकारकडून मंजूर होत नाही, तोपर्यंत राज्य सरकारच्या तिजोरीतून तो देण्याचंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री
राज्य सरकारकडून करण्यात येणाऱ्या मदतीमध्ये पिकांच्या नुकसानीसाठी २ हजार ८८ कोटी रुपये, सार्वजनिक आरोग्य आणि अतिरिक्त मनुष्यबळ ७५ कोटी, पडलेली घरे पूर्णपणे बांधून देण्याचं नियोजन आहे. याशिवाय रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ५७६ कोटी रुपये, तात्पुरत्या छावण्यांसाठी २७ कोटी, जनावरांसाठी ३० कोटी, स्वच्छतेसाठी ७९ कोटी रुपयांची तरतूद करण्याचे या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. छोट्या व्यावसायिकांना देखील मदत करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
या केल्या महत्त्वाच्या घोषणा –
- शाळा व इतर इमारतींसाठी १२५ कोटी
- घरांच्या नुकसानीपोटी २२२ कोटी
- रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ५७६ कोटी
- मत्स्य व्यवसायासाठी ११ कोटी
- तात्पुरत्या छावण्यांसाठी २७ कोटी
- छोट्या व्यावसायिकांना ३०० कोटी (प्रत्येकी कमाल ५० हजार)