घरमुंबई…अन्यथा, शिवसेना भवन परिसरातला कचरा उचलला जाणार नाही; मनसेचा इशारा

…अन्यथा, शिवसेना भवन परिसरातला कचरा उचलला जाणार नाही; मनसेचा इशारा

Subscribe

कंत्राटी वाहन चालक आणि स्वच्छता कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी मनसेच्या कामगार सेनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मुंबईतील घनकचरा व्यवस्थापन विभागातील कंत्राटी वाहन चालक आणि स्वच्छता कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढाकार घेतला आहे. ह्या कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास जी-उत्तर विभागात म्हणजेच दादर परिसरात काम बंद आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा मनसेने दिला आहे.

ह्याविषयी अधिक माहिती देताना महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे चिटणीस केतन नाईक म्हणाले की,”आपण जिथे राहतो, जिथे काम करतो तिथे निर्माण होणारा प्रत्येक प्रकारचा कचरा उचलण्यासाठी जी कचरा गाडी येते, त्या गाडीचा चालक आणि त्याच्यासोबतचा स्वच्छता कामगार हे कंत्राटी असतात. कंत्राटदार त्यांना सन्मानजनक वागणूक तर देतच नाहीत, उलट त्यांचं अनेक प्रकारचं शोषण करतात. कंत्राटदाराकडे काम करणाऱ्या ह्या कंत्राटी वाहन चालक आणि स्वच्छता कामगारांना किमान वेतन सुविधा, भविष्य निर्वाह निधी, कर्मचारी राज्य विमा सुविधा, वेतन पावती अशा कामगार कायद्यानुसार द्यावयाच्या किमान सुविधा मिळत नाहीत. पालिकेत कार्यरत सर्व कंत्राटी कामगारांना ४६ टक्के लेव्हीचे अधिदान केले जाते, परंतु कंत्राटदार त्याचेही पालन करत नाहीत. शहरातील वाहतूककोंडी वाढत असतानाही कंत्राटदारांना कमीतकमी डिझेलमध्ये फेरी पूर्ण करायची असते. डिझेल जास्त वापरले जात आहे, असं सांगत वाहनचालकांचे वेतन विनाकारण कापण्यात येते” असे म्हणत केतन नाईक यांनी स्वच्छता कामगारांच्या व्यथा, त्यांना न मिळणाऱ्या सुविधांचा पाढाच वाचला.

- Advertisement -

कामगारांचा पाठिंबा

केतन नाईक पुढे म्हणाले की, “कचरा वाहतूक ही महापालिकेच्या अत्यावश्यक सेवांपैकी एक असून ही सेवा पुरवणाऱ्या कामगारांना भेडसावणाऱ्या समस्या लवकरात लवकर सोडविण्यात याव्यात, ह्यासाठी आम्ही आजवर अनेकदा पालिका अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या, चर्चा केली. न्याय्य हक्कांसाठी तब्बल पाच वर्षं कामगार लढत आहेत. पण अपेक्षित न्याय मिळाला नाही. आता मात्र कंत्राटदार आणि पालिका अधिकारी ह्यांना ‘जोर का झटका’ देण्यासाठी ‘काम बंद’ आंदोलन करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे असे सांगून सर्व संबंधित कामगार आमच्या पाठिशी ठामपणे उभे आहेत असे केतन नाईक यांनी सांगितले.

सहायक आयुक्तांसोबत बैठक

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या पुढाकाराने ह्यासंदर्भातील एक महत्वपूर्ण बैठक शुक्रवार दि. २२ नोव्हेंबर रोजी महापालिकेच्या जी/उत्तर विभागाच्या सहायक आयुक्तांसोबत होणार आहे. ह्या बैठकीतसुद्धा कामगारांच्या मागण्यांवर सन्मानजनक तोडगा न निघाल्यास ‘काम बंद’ आंदोलन पुकारण्याशिवाय आमच्यासमोर कोणताही पर्याय शिल्लक राहणार नाही, असंही केतन नाईक ह्यांनी सांगितलं.

- Advertisement -

असंख्य समस्यांना तोंड देत शेकडो वाहन चालक आणि स्वच्छता कामगार रोज किमान १०-१२ तास राबतात आणि त्यांच्यामुळेच आपली मुंबई, आपला परिसर स्वच्छ राहतो. पण दुर्दैवाने पैशाला चटावलेले नफेखोर कंत्राटदार आणि असंवेदनशील प्रशासकीय अधिकारी ह्यांमुळे स्वच्छता कामगारांना न्याय मिळण्यास अक्षम्य दिरंगाई होत आहे. 
केतन नाईक, चिटणीस, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -