मुंबईकरांचा त्रास कमी करण्यासाठी रेल्वे विभागाने लवकरात लवकर रेल्वे सेवा सुरू करावी आणि महिलांसाठी विशेष सेवा सुरू करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री व मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे. राज्यसरकारने महिलांना प्रवास करण्यासाठी परवानगी दिल्यानंतर रेल्वेने नियमित सेवा सुरू केली नाही. ज्यामुळे महिला प्रवाशांना सुविधा मिळत नाही. एकीकडे रेल्वेमंत्री पियुष गोयल हे रेल्वे सेवा सुरू करण्यास तयार आहेत, मात्र राज्यसरकारने परवानगी दिली नाही असे सांगत आहेत. परंतु राज्य सरकारने आता परवानगी देवून सेवा का दिली जात नाही? असा सवाल करतानाच केंद्रसरकार यामध्ये राजकारण करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
'राज्य सरकारने महिलांना रेल्वे प्रवासाची मुभा दिली. मात्र रेल्वेकडून प्रवासाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली नाही. आमची मागणी आहे की, रेल्वेने लवकरात लवकर मुंबई लोकल सुरु करुन मुंबईकरांना दिलासा द्यावा', अल्पसंख्याक मंत्री @nawabmalikncp यांची प्रतिक्रिया pic.twitter.com/Lw7sgbUALj
— My Mahanagar (@mymahanagar) October 19, 2020
नवरात्रौत्सवात महिलांना मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची सुविधा मिळावी, यासाठी राज्य सरकार आग्रही आहे. अनलॉक ५ अंतर्गत सरकारने अनेक बाबी उघडण्यास परवानगी दिलेली आहे. तसेच रविवारपासून मोनो रेल्वे तर सोमवार पासून मुंबई मेट्रो सुरु करण्यास परवानगी दिली. त्यामुळे लोकल सेवा देखील लवकरच पुर्ववत करण्यात यावी, अशी मागणी अनेक स्तरातून पुढे येत आहे. याच मागणीला अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पुढे केले.
मुंबई लोकल सुरु करण्याच्या बाबतीत केंद्र सरकार राजकारण करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी यावेळी केला. गर्दी टाळण्यासाठी रेल्वेने जादा लोकल सोडाव्यात, गरज भासल्यास महिलांसाठी लेडिज स्पेशल ट्रेन सुरु कराव्यात, असेही पर्याय नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना सुचविले आहेत. तसेच लोकलसेवा पुर्ववत करण्यास राज्य सरकारची कोणतीही आडकाठी नसल्याचे मलिक यांनी सुचित केले आहे.