उल्हासनगर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर बिले वाटपाची कामं शहरातील महिला बचत गटांकडून करण्यात येते. मात्र आता हे काम खासगी कंपनीला सोपवण्यात येणार असल्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या मुद्याला विरोध दर्शवला आहे. तसेच या कामाला स्थगिती द्यावी, अशी मागणीही केली आहे. उल्हासनगरमधील मालमत्तांचे जी. आय. एस. आधारित सर्वेक्षण मँपिंग करण्यासाठी महापालिकेने निविदा मागवल्या होत्या. त्यानुसार हे काम मे. कोल्बो ग्रुप, नागपूर यांना देण्याचे निश्चित झाले आहे. या कंपनीद्वारेच आता मालमत्ता कराची बिलं देण्यात येणार आहेत. परंतू पालिकेमध्ये एकही सक्षम अधिकारी नाहीत. जे मे. कोल्बो ग्रुपच्या कामाचे लेखापरीक्षण करतील, असा आरोप मनसेचे जिल्हा अध्यक्ष सचिन कदम यांनी केला आहे.
आयुक्तांना दिले निवेदन
हे काम आयआयटी पवई येथील तज्ज्ञ व्यक्तींकडूनच केले जाऊ शकते, असेही त्यांचे म्हणणे आहे. ज्या कंपनीला काम देण्याचा घाट घातला जात आहे. त्यांनी या आधी पनवेल, अंबरनाथ, बदलापूर या शहराची कामे केली आहेत. पण त्या शहरामध्ये केलेली कामे समाधानकारक आहेत का? याची आपण स्वतः माहिती घ्यावी, असेही कदम यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
महिला बचत गटांमध्ये तीव्र नाराजी
सध्या बिलं वाटपाची कामं महिला बचत गटांमार्फत ४० लाख रुपयांमध्ये करण्यात येत आहे. तर हेच काम मे. कोल्बो कंपनीला ३ कोटी १० लाख रुपयांमध्ये देण्यात येणार आहे. या कंपनीला काम मिळाल्यास बचत गटातील महिला बेरोजगार होतील. त्यामुळे हे कंत्राट रद्द करावे अथवा ३ कोटी १० लाखांचा कंत्राट आम्हाला देण्यात यावा, असे महिला बचत गटांचे म्हणणे आहे. या संदर्भात महापालिका आयुक्त अच्युत हांगे यांना विचारले असता, बिलं वाटपाची कामं खासगी कंपनीला देण्याचा निर्णय शासनाच्या आदेशानुसार घेण्यात आला आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मे. कोल्बो या कंपनीला कंत्राट दिले गेले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.