मी अयोध्येला जाणार आहे, पण तारीख अद्याप निश्चित झाली नाही. आपण जातीच्या बाहेर जात नाही, कोणता हिंदुत्वाचा ध्वज आपण घेणार आहोत ? हिंदु म्हणून आपण कधी एकत्र येणार आहोत ? असा सवाल करत राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर हाक दिली आहे. त्याचवेळी मशीदीवरील भोंग्याचाही विषय राज ठाकरे यांनी लावून धरला. मशीदीवरील भोंगे बंद होत नसतील तर त्याच्यापुढे हनुमान चालीसा लावण्याचे आदेशही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला. राज ठाकरे यांनी एकुणच राज्यातील राजकीय परिस्थिती, जातीचे राजकारण, मुंबई महापालिकेचा कारभार, केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई अशा अनेक मुद्द्यांवर सरकारच्या कारभारावर टीका केली. शिवतिर्थावर आयोजित गुढी पाडवा मेळाव्याच्या निमित्ताने मनसैनिकांना संबोधित करताना ते बोलत होते.
प्रार्थना करण्यासाठी माझा विरोध नाही. प्रत्येक धर्मात प्रार्थना करण्याचा अधिकार आहे. पण त्याचवेळी त्या प्रार्थनेचा इतरांना त्रास होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे. मशीदीवरील भोंगे हे बाहेरील देशात प्रार्थनेसाठी लावण्यात आलेले दिसत नाहीत. धर्मासोबत भोंगे आले नव्हते. त्यामुळेच मशीदीच्या भोंग्यांना विरोधाची भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. मुंबईतील मदरशांमध्ये जे काही प्रकार घडत आहेत ते पाहता दुसऱ्या पाकिस्तानाची गरजही नसल्याचे ते म्हणाले. मुंबई पोलिसांसोबत बोलल्यावर अनेक गोष्टी सुरू असल्याचे कळते. पण केवळ मतांच्या राजकारणासाठी हे सगळ दडपल जात आहे. कधी काही घडल तर समाजासाठी ही अतिशय घातक गोष्ट असल्याची टीकाही राज ठाकरे यांनी केली.
देशात बाहेरच्या राज्यात जे सुरू आहे, तेच आपल्याला जातीच्या राजकारणाच्या निमित्ताने आता महाराष्ट्रातही सुरू करायचे आहे का ? सध्याची महाराष्ट्राची अवस्था पाहिली तर महाराष्ट्र खितपत जातीत खितपत पडला आहे. शिवरायांच्या राज्यात जातीपातीच राजकारण होतय हे दुर्दैव आहे. लोक जातीपातीच्या मुद्द्यावर एकमेकांविरोधात उभ रहावेत ही गोष्ट काही लोकांना हवी आहे. महत्वाचे म्हणजे राष्ट्रवादीला आणि शरद पवारांना एनसीपीला ही गोष्ट हवी आहे. जेव्हा महाराष्ट्रात १९९९ साली राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना झाली, तेव्हापासूनच जातीपातीच राजकारण मोठ्या प्रमाणात राज्यात सुरू झाले, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्याच्या निमित्ताने शिवतिर्थावर केला. जातीच्या निमित्ताने महाराष्ट्रात एकमेकांची भडकवायची कामे सुरू झाली. त्यामुळेच महाराष्ट्राची अशी जातीत हतबल झालेली अवस्था असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.