राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटली यांनी राज ठाकरेंना सध्या प्रसिद्धीची गरज असल्याचे वक्तव्य केले आहे. जयंत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रसिद्धीची गरज आहे त्यामुळे राज ठाकरे वीज बिलांच्या मुद्द्यावर आक्रमक झाले आहेत. त्यामुळेच त्यांनी राज्य सरकारला लक्ष केले आहे. यावरुन मनसेच्या महिला नेत्या रुपाली ठोंबरे यांनी जयंत पाटलांवर चांगलीच टीका केली आहे. सरकार म्हणून तुम्हाला हा जाब विचारण्यात आला आहे. तसेच कोणाला प्रसिद्धी पाहिजे हे सर्व जनतेला माहित आहे. तुम्ही टप्प्यात आल्यावर काम करता, पण मनसेवाले टप्प्यात आणून कार्यक्रम करतात त्यामुळे नको ती वक्तव्ये सोडून आपण सर्वसामान्यांच्या वीजबिलांच्या प्रश्नांना मार्गी लावावा अशी विनंती मनसेच्या महिला नेत्या रुपाली ठोंबरे यांनी म्हटले आहे.
जयंत पाटील यांनी भाषणात म्हटले होते की, राज्यातील वीजबिलांच्या मुद्द्यावर राज्य सरकार गंभीर आहे. परंतु शरद पवारांच्या घरी राज ठाकरे आणि अदानी आल्यामुळे हा वीज बिलांचा प्रश्न मागे राहिला आहे. आता राज ठाकरे यांना प्रसिद्धीची गरज आहे त्यामुळे ते वीज बिलांच्या प्रश्नावरुन सरकारला टोला लगावत आहेत. असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. परंतु जयंत पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे मनसैनिकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
राज्यातील भाजप नेत्यांनी सरकारला कर कमी करण्याचे शहाणपण शिकवू नये. केंद्राने इंधनावरील दरवाढ कमी करावे त्यामुळे दर नियंत्रणात येतील. असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. केंद्र सराकरडून करात एक रुपयाने दर कमी केले तरी जनतेला मोठा दिलासा मिळू शकतो असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
यावेळी जयंत पाटील यांनी फडणवीस यांच्यावरही टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे सरकार पलटवून लावू असे वक्तव्य केले होते. परंतु देवेंद्र फडणवीसांना कोणीही गांभीर्याने घेत नाही. असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.