कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकललेल्या आरटीई प्रवेश प्रक्रियेला २६ जूनपासून सुरुवात करण्यात आली. आरटीई प्रवेश घेण्यासंदर्भात २१९१ पालकांना मेसेज पाठवण्यात आले होते. परंतु १० दिवसांमध्ये मुंबईमधून अवघ्या २८६ पालकांनीच प्राथमिक स्तरावर प्रवेश घेतला आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरटीई प्रवेशाला पालकांकडून अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.
शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार (आरटीई) विनाअनुदानित शाळांतील २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवण्यात येतात. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी १७ मार्चला आरटीई सोडत काढण्यात आली. या सोडतीमध्ये मुंबईतून ५३७१ विद्यार्थ्यांची निवड झाली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी २१९१ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी २६ जूनपासून मेसेज पाठवण्यात आले तर उर्वरित ३१८० विद्यार्थ्यांना पुढील टप्प्यात मेसेज पाठवण्यात येणार आहेत. परंतु प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यापासून १० दिवसांमध्ये अवघ्या २८६ विद्यार्थ्यांच्या पालकांनी तात्पुरत्या स्वरुपात प्रवेश घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक पालक हे गावाला गेले असल्यामुळे प्रवेश प्रक्रियेला अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे बोलले जात आहे. प्रवेश प्रक्रियेला मिळत असलेल्या अल्प प्रतिसादामुळे संबंधित शाळा निरिक्षकांना याचा पाठपुरावा घेण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.
आरटीईच्या सोडतीमध्ये राज्यभरातून १ लाख ९२० तर मुंबईतून ५३७१ विद्यार्थ्यांची निवड, तर ७५ हजार ४६५ विद्यार्थ्यांची प्रतिक्षा यादी जाहीर केली. कोरोनामुळे जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे सोडत स्थगित केली होती. लॉकडाऊनची प्रक्रिया शिथिल होत असल्याने शिक्षण विभागाने २६ जूनपासून आरटीई अंतर्गत प्रवेश देण्यास सुरुवात करत तसे मेसेजे पालकांना मेसेज पाठवले. मेसेज पाठवलेल्या पालकांनी आवश्यक कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रती शाळेत सादर करून त्याची पडताळणी करायची आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना तात्पुरते प्रवेश देण्यात येईल, तसे हमीपत्र पालकांनी शाळेला द्यायचे आहे, असल्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून दिल्या आहेत.