इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) देशातील सर्व प्रमुख बौद्ध धर्माच्या स्थळांचे दर्शन घडविणारी ‘समानता एक्स्प्रेस’ नावाची भारत दर्शन रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ही विशेष रेल्वेगाडी १४ फेब्रुवारीला सुरू होणार असून नागपूर येथून सोडण्यात येणार आहे. एक्स्प्रेसच्या बुकिंगला सुरुवात झाल्याची माहिती आयआरसीटीसीचे पश्चिम विभागाचे समूह महाव्यवस्थापक अरविंद मालखेडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनाशी निगडित प्रमुख प्रेक्षणीय स्थळांचा या यात्रेमध्ये समावेश करण्यात आला आहे. चैत्यभूमी ( मुंबई ) जन्मस्थान (महू ) बोधगया (गया ) सारनाथ ( वाराणसी) लुंबिनी (नोतनवा) कुशीनगर (गोरखपूर) दीक्षाभूमी (नागपूर ) आणि परत मुंबईला येणार आहे. समानता एक्स्प्रेस पॅकेजची बुकिंग आयआरसीटीसीने वेबसाईटवर ऑनलाईन उपलब्ध करून दिली आहे. या समानता एक्सप्रेसमधून ८६४ प्रवासी प्रवास करू शकतात. त्यापैकी ३६५ जागा या आधीच आरक्षित झाल्याचे मालखेडे यांनी सांगितले.
प्रवास शुल्क
पॅकेज ( १० रात्री -११ दिवस )
सॅण्डर्ड – १० हजार ३९५ रुपये
कम्फर्ट – १२ हजार ७०५ रुपये
या सुविधा मिळणार
बौद्धस्थळांचे दर्शन घडविणार्या समानता एक्स्प्रेसमध्ये आयआरसीटीसीच्या वतीने प्रवाशांना खाद्यपदार्थांपासून स्थळांवर नेण्याची सुविधा देण्यात येणार आहे. त्यासाठी १० दिवस भोजनाच्या व्यवस्थेशिवाय धर्मशाळा, लॉज आदी ठिकाणी थांबण्याची चांगली सुविधा देण्याची तयारी करण्यात आली आहे. प्रवासात प्रवाशांना शाकाहारी भोजन देण्यात येणार आहे. समानता एक्स्प्रेससाठी आरक्षण सुरू झाले आहे. १६ कोचच्या या गाडीत १२ स्लिपर, १ एसी थ्री टायर आणि ३ जनरल कोच राहतील. प्रवासात १०० कर्मचारी प्रवाशांच्या सेवेसाठी हजर राहतील. आगामी काळात यासारख्या आणखी प्रवासी रेल्वेगाड्या चालविण्यात येणार आहेत.