भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या कधी वाईन विक्रीवरून तर कधी कोवीड सेंटरमधील घोटाळ्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना सातत्याने लक्ष्य करत आहेत. तर दुसरीकडे ईडीची पिडाही राऊत यांच्या मागे लागल्याने संतप्त झालेल्या राऊतांनी भाजपविरोधात एल्गार पुकारला आहे. याचपार्श्वभूमीवर आज राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी राऊतांनी भाजप नेते दिल्लीत तीनवेळा भेटल्याचे सांगितेल. तसेच या सरकारमधून बाहेर पडा, आम्ही राष्ट्रपती राजवट लावू, नाहीतर आमदारांना फोडून आम्ही सरकार बनवू. तुम्ही आम्हाला मदत केली नाही तर तुम्हांला टाईट करू अशा धमक्या दिल्याचा खळबळजनक आरोप यावेळी राऊत यांनी केला.
तसेच यावेळी राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपल्याला फोनवरून आशिर्वाद दिल्याचे सांगितले. तसेच ज्या शिवसेना वास्तूने अनेक हल्ले पचवले, याच वास्तूखाली बॉम्बस्फोटही झाल्याचे सांगत राऊत यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला. भाजप कडून जाणीवपूर्वक आपल्याला टार्गेट केले जात असून महाआघाडी सरकार पाडण्यास मदत न केल्यास तुम्हांला टाईट करू अशी धमकी आपल्याला भाजप नेत्यांनी दिली पण त्यास न जुमानलण्यानेच आपल्याविरोधात या कारवाया सुरू झाल्याचा गौप्यस्फोट यावेळी त्यांनी केला. तसेच महाराष्ट्र गांडूची औलाद नाही, मराठी माणूस नामर्द नाही.यामुळे तुम्ही कितीही वार केलेत तरी त्याला आम्ही घाबरणार नाही असा इशारा देत राऊत यांनी सध्या शिवसेना, ठाकरे कुटुंब, आनंदराव अडसूळ, अनिल परब, भावना गवळी, पवार कुटुंब, रवींद्र वायकर यांच्यावर हल्ले होत असल्याचे सांगत महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि झारखंड मध्येही असेच सुरू असल्याचे ते म्हणाले.