मध्यप्रदेश येथे राजकीय घडामोडी सुरू असून, महाराष्ट्रात देखील महाविकास सरकार कोसळेल असा विश्वास भाजप नेत्यांना वाटत असतानाच आता खुद्द शरद पवार यांनी राज्यातील सरकार पाच वर्षे टिकेल असे म्हणत ‘शिमगा संपला आता नवीन मुहूर्त शोधा’ असा टोलाच लगावला आहे. मध्य प्रदेशमधील राजकीय घडामोडींनंतर राज्यात देखील पाडव्यापर्यंत काही तरी घडेल असे भाजप नेत्यांकडून सांगण्यात येते असे शरद पवार यांना पत्रकारांनी विचारल्यानंतर शरद पवार यांनी भाजपला टोला लगावला. दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला असून, पक्षाचे राज्यातले महत्त्वाचे नेते आणि माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या गोटातले समजले जाणारे ज्योतिरादित्य शिंदे यांनी अखेर भाजपचा झेंडा हाती धरला आहे. त्यांनतर महाराष्ट्रात देखील असा काही भूकंप होणार का? अशी चर्चा सुरु असतानाच शरद पवार यांनी मात्र हे सरकार पाच वर्षे टिकेल असा विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान, यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘महाराष्ट्रामध्ये सरकारचे काम चांगले चालले असून, हे सरकार पाच वर्ष काम करेल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वांना एकत्र घेऊन पुढे जात आहेच’, असे ते म्हणाले.
कमलनाथ यांच्यावर पवारांना विश्वास!
दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये घडलेल्या राजकीय घडामोडीवर बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘मी कमलनाथ यांना ओळखतो. त्यांच्या कतृत्वावर लोकांचा अजूनही विश्वास आहे. त्यामुळे अजूनही मध्य प्रदेशमध्ये चमत्कार घडेल असे वाटते’, असे शरद पवार यांनी यावेळी सांगितले. तसेच मध्य प्रदेश येथे जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे त्याबाबत काँग्रेस नेतृत्वाला जबाबदार धरणे योग्य नसल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले. ज्योतिरादित्य यांचा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर त्यांच्यावर देखील पक्षाने एखादी जबाबदारी द्यायला हवी होती, असे शरद पवार यावेळी म्हणाले.
मनसेच्या शॅडो कॅबिनेटवरही साधला निशाणा
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शॅडो कॅबिनेट या संकल्पनेवर देखील शरद पवार यांनी जोरदार निशाणा साधला. ‘एक पक्ष म्हणून काहीतरी केले पाहिजे आणि आपण जे करतोय ते लोकांपर्यंत नेले पाहिजे’, असे म्हणत शरद पवार यांनी शॅडो कॅबिनेटवर जोरदार टीका केली.