डहाणू : अंगणवाडी सेविका यांचा काही महिन्यांपासून संप सुरू होता. त्यामुळे गेले दोन महिने बंद असलेल्या अंगणवाड्या या महिन्यात सुरू झाल्या आहेत. त्यामुळे लहान मुले, गर्भवती-स्तनदा माता यांना पुन्हा एकदा आहार मिळण्याची सोय झाली आहे. परंतु जिल्ह्यातील अनेक अंगणवाड्यांमध्ये धान्य पुरवठा करताना खराब कीड लागलेले धान्य वाटप केल्याचे समोर आले आहे.साठा तसाच राहिल्याने सडल्याचा अंदाज आहे. त्यामुळे बरेच लाभार्थी हे धान्य घेण्यास नकार देत आहेत. एकाबाजूने सरकार गरोदर माता, बालकांमधील कुपोषण मुक्त करण्याच्या प्रयत्नात आहे. तर त्याच माता स्तनदा , बालकांना किड लागलेली धान्य , पोषण आहार पुरवला जात आहे. किड पडलेले , मुदत संपलेली कडधान्य ही बंद पॉकेटद्वारे पुरवली गेल्याचा धक्कादायक प्रकार हा डहाणू तालुक्यातील ग्रामीण भागात पाहायला मिळाला आहे.
अंगणवाडीमधून लहान मुले, गर्भवती आणि स्तनदा माता यांना दरमहा हरभरा, गहू, दाळ ,साखर तसेच मसाला अशा सकस आहार यांचे वाटप केले जाते. हे धान्य वाटप करताना अडचण येऊ नये यासाठी एक एक किलोच्या बंद पाकिटात हे धान्य येते. फेब्रुवारी महिन्यामध्ये वाटप करण्यात आलेल्या पाकिटबंद हरभर्याच्या पाकिटमध्ये कीड पडलेले व खाण्यास निरुपयोगी अशा प्रकारच्या धान्याचे वाटप जिल्ह्यातील अनेक अंगणवाड्यांमध्ये करण्यात आले आहे. धान्य वाटप झाल्यानंतर ही पाकिटे घरी नेल्यावर फोडल्यावर हा प्रकार समोर आला आहे. पाकिटबंद धान्य खराब निघाल्याने लाभार्थ्यांकडून हे पाकीट पुन्हा अंगणवाडीत आणून दिले जात आहे. पाकिटबंद धान्य खराब आल्याने नेमके काय करावे याबाबत अंगणवाडी सेविकाही संभ्रमात पडल्या आहेत. तसेच शासनाने जातीने लक्ष घालून अशा या निकृष्ट , सडक्या , किडे पडलेले अन्य पुरवठा करण्यावर गुन्हा नोंदवावा ,अशी मागणी होत आहे.
प्रतिक्रिया
या संदर्भात जिल्ह्यात कोण-कोणत्या अंगणवाड्यांमध्ये अशा प्रकारचे धान्य वाटप झाले आहे, याची तात्काळ सखोल माहिती घेऊन सदर पुरवठादारावर कटाक्षपणे योग्य ती कारवाई करण्यात येईल. तसेच अंगणवाडी सेविका यांनी धान्य ताब्यात घेताना ते योग्य आणि मुदत संपलेले आहे की नाही याची जाणीवपूर्वक खात्री करावी. खराब धान्य उतरवून घेऊ नये.
प्रवीण भावसार, महिला व बालकल्याण अधिकारी, पालघर