घरपालघरWada Traffic congestion: बेशिस्त वाहन चालकांमुळेच वाड्यात वाहतूक कोंडी

Wada Traffic congestion: बेशिस्त वाहन चालकांमुळेच वाड्यात वाहतूक कोंडी

Subscribe

वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी येथील नगरपंचायत प्रशासन, पोलीस यंत्रणा व लोकप्रतिनिधींना यश आलेले नाही.

वाडा: पालघर – वाडा – देवगांव – नाशिक हा राज्यमार्ग वाड्यातील मुख्य बाजारपेठेतून गेला आहे. बाजारपेठेतील या रस्त्याच्या लगतच दुतर्फा व्यापारी वर्गाने दुकाने थाटली आहेत. त्यामध्ये अणखीन भर म्हणजे बेशिस्त वाहन चालक नव्याने रुंदीकरण केलेल्या जागेवर तासनतास वाहने उभी करुन बाजारपेठेत खरेदीसाठी फिरत असतात. या बेशिस्त वाहन चालकांना पोलिसी खाक्या दाखविण्याची गरज आहे. या रस्त्यावर पादचार्‍यांनाही चालणे मुश्किल होऊन बसेल असे येथील नागरिकांकडून बोलले जात आहे. पालघर – वाडा – देवगांव – नाशिक हा राज्यमार्ग वाड्यातील खंडेश्वरी नाका ते परळी नाका या एक किलोमीटर लांबीच्या बाजारपेठेतून गेला आहे. तीन वर्षांपूर्वीच या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले आहे. रुंदीकरण करताना दुतर्फा गटारींचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र येथील काही व्यापार्‍यांनी गटारावरच अर्धी अधिक दुकाने थाटली आहेत. तर रस्ता रुंदीकरण केलेल्या जागेवर काही बेशिस्त वाहन चालक दुचाकी, चारचाकी वाहने उभी करुन बाजारपेठेत खरेदीसाठी फिरत असतात. या बेशिस्त वाहन चालकांवर पोलीस विभाग, नगरपंचायत प्रशासन यांच्याकडून कुठलीही कारवाई होत नसल्याने येथील वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे. वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी येथील नगरपंचायत प्रशासन, पोलीस यंत्रणा व लोकप्रतिनिधींना यश आलेले नाही. या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करणारे बसचालक व पादचारी प्रशासनाच्या या ढिल्या कारभारावर संताप व्यक्त करीत आहेत.

या रस्त्याच्या रंदीकरणानंतर येथील वाहतूक कोंडी कमी होईल, अशी अपेक्षा येथील नागरिकांनी केली होती. मात्र रुंदीकरण केलेल्या जागेचा उपयोग वाहन चालकांनी वाहनतळ केल्याने येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न जैसे थे राहिला आहे. रस्त्यावर होणार्‍या या अनधिकृत वाहनतळा (पार्किंग) विरोधात येथील नगरपंचायत प्रशासन व पोलीस यंत्रणे कडून थातूरमातूर कारवाई करत असल्याने येथील वाहतूक कोंडीत दररोज भर पडत आहे. या वाहतूक कोंडीचा त्रास अन्य वाहनचालकांना तर होतोच, पण रस्त्याच्या कडेला चालणार्‍या पादचार्‍यांना अधिक होत आहे.

- Advertisement -

विद्युत खांब, मोकाट जनावरे
रस्त्याचे रुंदीकरण करताना अजूनपर्यंत न हटविलेले विजेचे खांब तसेच संध्याकाळच्या वेळेस या रस्त्यावर मोठ्या संख्येने येणारी मोकाट गुरे यांच्यामुळेही वाहतूक कोंडी होण्यास भर पडत आहे.

सम, विषम पार्किंगची गरज
या मार्गावर दुतर्फा वाहने पार्किंग केली जात असल्याने वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत असते. सम तारखेस पूर्व या एकाच बाजूला तर विषम या तारखेला पश्चिम या विरुद्ध बाजूस पार्किंगची शिस्त लावल्यास येथील वाहतूक कोंडीची समस्या बर्‍यापैकी कमी होऊ शकते, असे येथील नागरिकांकडून बोलले जात आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -