सामनाकार बोरूबहाद्दर संजय राऊत आणि अर्थशास्त्र यांचा काडीचाही संबंध नाही. संबंध असला तर तो टक्केवारीशी आहे त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीवरुन त्यांना राममंदिराची वर्गणी आठवली काँग्रेसचा वाण नाही तर गुण त्यांना नक्की लागला असा घणाघात भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर केला आहे. मागील काही दिवासंपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात होणाऱ्या वाढीमुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरुन केद्र सरकारवर टीका केली होती. यावर भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरुन राममंदिरासाठी चंदा वसुली करण्यापेक्षा पेट्रोल डिझेलचे भाव चंद्राला भिडत आहेत, ते खाली आणि अशा खोचक शब्दांत टीका केली होती. यावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत राऊतांचा समाचार घेतला आहे. अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हटले आहे की, सामना, संजय राऊत आणि अर्थशास्त्राचा जसा काडीचाही संबंध नाही तसा पेट्रोलच्या दराचा आणि रामवर्गणीचाही संबंध नाही. पेट्रोल दरवाढीवर बोलण्याआधी राज्य सरकारने आकारलेला २६ टक्के व्हॅट तर कमी करा. असे आपल्या ट्विटमध्ये अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.
सामना, संजय राऊत आणि अर्थशास्त्राचा जसा काडीचाही संबंध नाही तसा पेट्रोलच्या दराचा आणि रामवर्गणीचाही संबंध नाही.
पेट्रोल दरवाढीवर बोलण्याआधी राज्य सरकारने आकारलेला 26 टक्के VAT तर कमी करा. pic.twitter.com/XDpAxaJhli— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 22, 2021
आपल्या ट्विटसह भाजपनेते अतुल भातखळकर यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, सामनाकार बोरुबहाद्दर संजय राऊत आणि अर्थशास्त्र याचा काडीचाही संबंध नाही. संबंध असल्यास तो टक्केवारीशी आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या भाव वाढीवरुन त्यांना राम मंदिराचा चंदा आठवला, काँग्रेसमुळे वाण नाही पण गुण राऊतांना नक्कीच लागला आहे. पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये २६ रुपयांचा व्हॅट राज्य सरकारचा आहे. तो कमी करा ममता बॅनर्जींचे एवढे तरी ऐका आणि मग मोदींवर टीका करा. तसेच केद्र सरकार जो टॅक्स गोळा करत आहेत. त्यातील ४१ टक्के तुम्हाला मिळतो आहे. त्यामुळे लोकांना विनाकारण भरकटवायचं आणि खोटं बोलायचे उद्योग आता बोरुबहाद्दर संजय राऊत यांनी बंद करावे असे भाजप नेते अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.
काय म्हटले आहे अग्रलेखात
लोकांना जगण्याचा हक्क आहे. व त्यातही जीवनावश्यक गोष्टींचे भाव नियंत्रित ठेवणे हे सरकारचे कर्तव्य ठरते. केंद्रातील सरकारला आपल्या कर्तव्याचा विसर पडला असेल तर जनतेने हा स्मृतिभ्रंश दूर करायला हवा. राम मंदिरासाठी चंदा वसुली करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव चंद्राला भिडत आहेत ते खाली आणा त्यामुळे रामभक्तांच्या चुली पेटतील व श्रीरामही खूश होतील असे सामानाच्या अग्रलेखात म्हटले आहे.