घररायगडकोट्यावधीच्या भिंती तरीही दरडींचा धोका कायम, वरंध घाटातील प्रवास रामभरोसे

कोट्यावधीच्या भिंती तरीही दरडींचा धोका कायम, वरंध घाटातील प्रवास रामभरोसे

Subscribe

महाड-भोर-पुणे मार्गावरील वरंध घाटात नियोजनबद्ध काम होत नसल्याने खराब झालेला रस्ता, पडलेले खड्डे, दरड कोसळण्याची संभाव्य ठिकाणे यामुळे हा मार्ग ऐन पावसाळ्यात वाहतुकीस धोकादायक ठरत असून, तेथून होणारा प्रवास रामभरोसे आहे. आश्चर्याची बाब म्हणजे नुकत्याच झालेल्या कामातील माती, दगड तसेच ठेवून हा मार्ग वाहतुकीस खुला करण्यात आला आहे.

रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडला जाणारा हा मार्ग गेले काही वर्षे भूस्खलन आणि दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे सातत्याने बंद पडत आहेत. यामुळे या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभाग दरवर्षी करोडो रुपये खर्च करीत आहे. मात्र तरी देखील हा घाट मार्ग वाहतुकीस धोकादायक ठरत आहे. सरंक्षक कठडे, पाण्याचा निचरा होण्यासाठी गटार व्यवस्था आणि इतर आवश्यक बाबी दरवर्षी करणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे नित्याचे काम आहे. याकरिता केलेल्या तरतुदीनुसार खर्च केला जातो.

- Advertisement -

आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास किंवा घाट मार्ग बंद पडल्यास वापरली जाणारी यंत्रणा, केली जाणारी पर्यायी व्यवस्था आणि उपाययोजना यावर मात्र विशेष तरतूद करून खर्च केला जातो. मात्र घाटात कोसळणार्‍या दरडींवर पर्याय म्हणून महाकाय भिंती उभ्या करणे हा सपाटा सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाने लावला आहे. आधीच उभ्या डोंगर भागात तयार केलेल्या या मार्गावर पुन्हा वजनदार भिंती उभ्या करणे भविष्यात धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन वर्षांपासून घाटात ज्या ठिकाणी दरडी कोसळणे आणि भूस्खलन झाले होते त्या ठिकाणी सिमेंट काँक्रीटच्या भिंती उभ्या केल्या आहेत. गतवर्षी उभी केलेल्या भिंतीची रचना माटुंग्याच्या व्हीजेटीआय इन्स्टिट्यूटकडून करून घेण्यात आलेली होती. जवळपास 8 कोटी खर्चाची भिंत उभी करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता बी. एन. बहिर यांनी दिली होती. हे काम झाल्यानंतर डांबरीकरण काम केले जाणार होते.

- Advertisement -

यावर्षी देखील अशाच पद्धतीचे काम करण्यात आले असून, यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने जवळपास ६ कोटी रुपये खर्च केले आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करून उभ्या करण्यात आलेल्या भितींच्या कामानंतर रस्त्यात पडलेली माती, दगड आणि इतर कचरा तसाच ठेवून रस्ता वाहतुकीस सुरू करण्यात आला आहे. श्री वाघजाई मंदिराच्या अलीकडे अनेक ठिकाणी हा मार्ग खोदून ठेवण्यात आला आहे.रूंद असलेल्या या घाट मार्गात कायम धुके असल्याने हा मार्ग दुचाकीस्वारांना धोकादायक बनला आहे.

ज्या ठिकाणी भिंती उभ्या केल्या आहेत त्या शेजारील भाग देखील मातीचा असल्याने या पावसात अनेक ठिकाणी माती खाली येत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे दरडीचा धोका हा कायम असल्याने करोडोच्या भिंती किती ठिकाणी उभ्या करणार, असा सवाल यामुळे निर्माण झाला आहे. माझेरीजवळ गेल्या वर्षी ऐन पावसाळ्यात मोठा परिसर खचला गेला आहे. यामुळे हा मार्ग देखील जवळपास दोन ते तीन ठिकाणी खचला गेला होता. या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात डांबरीकरण करून खचलेला भाग भरून काढण्यात आला असला तरी या परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसात हा भाग पुन्हा खचण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -