घररायगडआधी पुनर्वसन मगच प्रकल्प; उरणमधील ग्रामस्थ विविध मागण्यांसाठी आक्रमक

आधी पुनर्वसन मगच प्रकल्प; उरणमधील ग्रामस्थ विविध मागण्यांसाठी आक्रमक

Subscribe

उरण: सिडकोच्या प्रकल्पापासून पारंपारिक मच्छीमारांची रोजी रोटीची मासेमारी ज़मीन वाचावे तसेच गुरे चरणाची संपूर्ण जागा सेझ मधून वगळण्यात यावी,मच्छीमारांना घरटी नुकसान भरपाई मिळावी आणि पारंपारिक मच्छीमारीचा रस्ता मोकळा ठेवावा, गावाला कायमस्वरूपी खेळाचे मैदान मिळावे, गावाची मेन उघडी (कळवड) चे काम करून सर्व परिसर स्वच्छ करून मिळावा,आधी पुनर्वसन मगच प्रकल्प करावे या विविध मागण्यांसाठी येथील कोळीवाडा ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. गुरुवारी कोटनाका काळाधोंडा येथे सिडकोने सुरु केलेले भरावाचे काम ग्रामस्थांनी थांबविले तसेच सिडकोने सुरु केलेल्या कामाचा निषेध केला.
येथील मोरा समुद्रकिनारा,भवरा, बोरी असे समुद्रकिनारे, खाडी आहेत. हे खाडी, समुद्र किनारी वरील जागा सिडकोला आपल्या घशात टाकायचे आहेत. व येथील स्थानिक असलेल्या आगरी कोळी, कराडी समाजाला येथून हद्दपार करायचे असल्याने हा सिडकोचा कुटील डाव आहे अशा आरोप नागरिकांनी यावेळी केला.
बायपास रस्त्याचे हे काम सध्या सिडकोकडे आहे. उरण बायपास (बाह्य रस्ता ) उरण कोटनाका – काळाधोंडा येथे मोठ्या प्रमाणात खारफुटी आहेत, समुद्राची खाडी सुद्धा आहे. या खारफुटी तोडूनखाडीवर मातीचा भराव करून हा बाह्य रस्ता बनविला जाणार आहे. हा रस्ता झाल्यास मोरा आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना उरण बायपासमार्गाने सरळ शहराच्या बाहेरून निघता येईल आणि प्रवास सुखाचा होईल. तसेच भारताच्या संरक्षण खात्याच्या एनएडी(नेव्हल अर्मानेन्ट डेपो ) या उरणमधील केंद्रावरून दारुगोळा तसेच शस्त्रास्त्र आणणे नेणे सोप्पे होणार आहे, असे शासकीय अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. मात्र ही जमीन उरण कोळीवाडा ग्रामस्थांची असून कोळीवाडा ग्रामस्थांना विचारात न घेता,विश्वासात न घेता या बाह्य रस्ताचे काम सुरू करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
याबाबत उरण बायपास रस्त्याचे काम थांबविण्यात यावे,आधी पुनवर्सन मगच प्रकल्प या मागणीसाठी उरण कोळीवाडा ग्रामस्थांनी मुंबई उच्च न्यायालयात सुद्धा याचिका दाखल केली आहे. सदर रस्त्याच्या कामाचा विषय हायकोर्टात प्रलंबित असल्याने सिडकोने सुरु केलेल्या रस्त्याच्या भरावाच्या कामाला ग्रामस्थांनी विरोध केला.

पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांनी घेतले ताब्यात 
काम बंद करावे, अशी मागणी काम सुरु असलेल्या ठिकाणी ग्रामस्थांनी नायब तहसीलदार नरेश पेढवी, न्हावा शेवा बंदराचे सहाय्यक पोलीस आयुक्त धनाजी क्षीरसागर, पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील, गुन्हे विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण,सिडकोचे कार्यकारी अभियंता हणमंत न्हाणे यांच्याकडे केली होती. मात्र ग्रामस्थांच्या मागणीकडे शासकीय अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केल्याने,काम सुरु ठेवल्याने ग्रामस्थांनी सुरु असलेले काम बंद करण्याचा निर्णय घेतला. काम सुरु असताना मध्येच ग्रामस्थ आले त्यामुळे पोलीस अधिकारी कर्मचार्‍यांनी त्यांना ताब्यात घेतले. अंदाजे ११० हून अधिक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. या सर्वांना पोलीस व्हॅनमध्ये बसवून दास्तान फाटा येथे नेण्यात आले.उरण बायपास रस्ता प्रकल्पात १३४ हून अधिक शेतकरीबाधित असून त्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही.

- Advertisement -

ग्रामस्थांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत.जोपर्यंत ग्रामस्थांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उरण बाय-पासचे काम बंद ठेवण्यात यावे अशी आम्हा सर्व ग्रामस्थांची मागणी आहे.तसेच अनेक विविध मागण्या आहेत यासाठी मी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री, तहसिलदार आदि ठिकाणी पत्रव्यवहार सुद्धा केला आहे.शासनाने आमच्या मागण्या मान्य कराव्यात.
– सुनिल भोईर,
माजी सदस्य ग्रुप ग्रामपंचायत चाणजे.

उरण बायपास रस्त्याचे काम सुरू असताना कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. ग्रामस्थांनी शासकीय कामात अडथळा आणल्याने, ग्रामस्थांनी काम थांबविल्याने उपस्थित ग्रामस्थांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी ग्रामस्थांना ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही सुरु आहे.
– धनाजी क्षीरसागर
सहाय्यक पोलिस आयुक्त
न्हावा शेवा बंदर.

- Advertisement -

महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसारच उरण बायपास रस्त्याचे काम सुरु असून या रस्त्यासाठी लागणारे सर्व आवश्यक ते परवानग्या घेतल्या आहेत. नागरिक आणि ग्रामस्थांनी या रस्त्यासाठी प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य करावे.
– हनुमंत न्हाणे
कार्यकारी अभियंता(II ), सिडको, द्रोणागिरी नोड.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -